कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
चंदगड तालुक्यात शेकडो एकर शासकीय जमिनीचा अपहार करण्यात आला आहे. महसूल व अन्य शासकीय अधिकारी कर्मचाऱयांनी संगनमताने शासकीय जमिन परस्पर खाजगी लोकांच्या नावावर केली आहे. या प्रकरणी आजपर्यंत सहा जणांना अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अद्याप मोकाट असून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी शनिवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.
चंदगड येथे शासकीय मालकीची हेरेसरंजाम प्रकारातील 500 एकर जमिन आहे. या जमिनीच्या सात बारावर खाडाखोड करुन जमिन हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्सारी मुल्ला यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. सन 1991 ते 92, सन 2009 ते 2010 या कालावाधीमध्ये हा प्रकार घडला होता. याबाबत अन्सारी यांनी चंदगड पोलीसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. संशयीतांनी शासकीय जमिनीचा अपहार करुन शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी अद्याप पाच ते सहा जणांना अटक करण्यात आले आहे.मात्र या प्रकरणातील मुख्य संशयीत अद्यापही मोकाट आहे. त्याला अटक करावी. पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावास बळी पडू नये अशी मागणी करण्यात आली. अन्यथा सनदशिर मार्गाने जनआंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी रमेश मोरे, अशोक पोवार, भाऊ घोडके, किशोर घाडगे, शंकराव शेळके, सुभाष देसाई, अंजुम देसाई, चंद्रकांत पाटील, राजेश वरक, श्रीकांत भोसले, ऍडव्होकेट सपना हराळे, लहूजी शिंदे, महादेव पाटील, रमाकांत आंगे आदी उपस्थित होते.