प्रतिनिधी /चंदगड :
चंदगड तालुक्यात गेल्या सोमवारपासून तुफानी पाऊस सुरू असून सलग चौथ्या दिवशीही सरासरी शंभर मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती जैसे थेच आहे. चौकुळ ते इसापूर या मार्गातील सुमारे 20 मीटर अंतरातील रस्ता खचला असून या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. दरम्यान घटप्रभा, जांबरे पाठोपाठ जंगमहट्टी मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे.
ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीवरील सर्वच कोल्हापूर टाईप बंधारे पाण्याखाली आहेत. दाटे नजिक बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर आलेल्या पाण्याची पातळी एक फूटाने कमी झालेली असली तरी अध्याप या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झालेली नाही. गवसे नजिक घटप्रभा नदीवर नवा उंच पुल उभा करूनही गवसेच्या बाजूने पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. चंदगड-गडहिंग्लज, चंदगड-तिलारी, चंदगड-बेळगाव आदी सर्वच प्रमुख मार्ग बंद आहेत. इसापूर ते चौकुळ हा रस्ता तीन वर्षापूर्वी वाहतुकीस खुला करण्यात आलेला असून त्यामार्गापैकी 20 मीटर अंतरातील रस्ता खचल्याने इसापूर ते आंबोली ही वाहतूक थांबली आहे. हा रस्ता निसर्गरम्य असून अनेक पर्यटक वर्षासहलीच्या निमित्ताने या मार्गावरून प्रवास करीत असतात. जंगमहट्टी मध्यम प्रकल्प गुरूवारी सकाळी 7 वाजता भरला असून त्यापाठोपाठ आंबेवाडी, दिंडलकोप आणि काजिर्णे बंधाराही पूर्ण क्षमतेने भरला आहे. सोनारवाडी येथील ईश्वर नाईक (30000), खालसा गुडवळे येथील शिवाजी गावडे (50000), कोवाड येथील राजाराम भोगण (1 लाख), मोटणवाडी येथील गंगाराम दळवी (2000), पार्ले येथील जोतिबा दळवी (2000), सोनारवाडी येथील महादेव गावडे (25000) तर आमरोळी येथील रावसो मंडलिक (10000) यांच्या घरांच्या भिंती पडून एकूण 2 लाख 19 हजारांचे नुकसान झाले आहे.