प्रतिनिधी / कुदनूर
चंदगड तालुक्यात मुंबई, पुणे यासह इतर ठिकाणाहून चाकरमानी दाखल होत आहेत. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आवश्यक त्या तपासण्या करून ते तालुक्यात येत असून, येथील अनेक असुविधांमुळे चाकरमान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या अडचणी संपता संपेनात, अशी स्थिती येथे पाहावयास मिळत आहे. तालुका तसेच स्थानिक प्रशासनाने त्यांच्या असुविधा दूर कराव्यात असा सुर उमटू लागला आहे.
कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अशा शहरांमध्ये अडकलेले चाकरमानी आपल्या मूळगावी परतत आहेत. लॉकडाऊनच्या तिसर्या टप्पात शासनाकडून चाकरमान्यांना आवश्यक तो परवाना घेऊन गावी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या ठिकाणी अडकून पडलेले चाकरमानी गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. ज्या चाकरमान्यांकडे जिल्ह्यात जाण्याचे पास आहेत त्यांना वाहनांसह जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. मात्र, शहरातील अडचणींचा पाढा येथेही सुरूच असल्याचे चित्र आहे.
संस्थात्मक विलगीकरणामध्ये असुविधा
प्रशासनाच्या नियोजनानुसार तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांची तपासणी करून गरजेनुसार त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येते. मात्र, चंदगड तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणाच्या बर्याच ठिकाणी अस्वच्छता, शौचालयाचा अभाव, अस्वच्छ पिण्याचे पाणी आदी समस्यांमुळे चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी तर चक्क चाकरमान्यांना स्वतः स्वच्छतेसह इतर गोष्टींची सोय करून घ्यावी लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
स्वॅबसाठी टोकन प्रणाली
विविध शहरातून आलेले चाकरमानी चंदगड येथे आरोग्य तपासणीसाठी गेले असता त्यांना टोकन दिले जात असून, फोन करून बोलवले जाईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्या चाकरमान्यांपैकी एखाद्यालाही कोरोनाचा संसर्ग झालेला असेल आणि ती व्यक्ती जर तपासणीपूर्वी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारत असेल तर, अशावेळी किती लोकांशी संपर्क येईल याचा विचार प्रशासनासह आरोग्य विभागाने करणे गरजेचे आहे.
गावापासून दोन किमी अंतरावर गरोदर मातेची सोय
लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसापासून माझा भाऊ आणि गरोदर वहिणी यांना गावी आणण्यासाठी प्रयत्न करत होतो. सर्व तयारी करून झाल्यावर अखेर त्यांना प्रशासनाच्या परवानगीने गावी आणण्यात आले. मात्र, गावात आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणातील गैरसोयीमुळे त्यांना गावापासून दोन किमी अंतरावरील एका घरात ठेवण्यात आले आहे. गरोदर मातेचा सुद्धा स्थानिक प्रशासनाकडून विचार केला गेला नाही.
लक्ष्मण शहापूरकर, कुदनूर