14 जागांवर विजयासह धमाकेदार एंट्री : भाजपचे महापौर पराभूत
वृत्तसंस्था /चंदीगड
चंदीगड महापालिका निवडणुकीच्या निकालाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि काँग्रेसला मागे टाकत आम आदमी पक्षाने या केंद्रशासित प्रदेशात धमाकेदार एंट्री केली आहे. ‘आप’ने एकूण 35 जागांपैकी 14 जागांवर विजय मिळविला आहे. भाजपने 12 आणि काँग्रेसने 8 जागांवर यश मिळविले. अकाली दलाला एका जागेवर यश मिळाले.
महापौर आणि भाजप उमेदवार रविकांत यांनाच या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यांना आम आदमी पक्षाचे उमेदवार दमनप्रीत सिंह यांनी 828 मतांनी पराभूत केले आहे. भाजपचे 3 माजी महापौर देखील या निवडणुकीत हरले आहेत.
आम आदमी पक्षाने चंदीगड महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत लक्षणीय यश मिळविले आहे. या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्वबळावर बहुमत मिळू शकले नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. परंतु महापौरपदाच्या शर्यतीत आम आदमी पक्ष आता आघाडीवर असणार आहे. काँग्रेसची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. महापालिका निवडणूक प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातच लढली गेली होती.
चंदीगडवासीयांना केजरीवाल यांचे वीज-पाणी मोफत देण्याचे मॉडेल पसंत पडले आहे. चंदीगडमधील विजयाचा मुद्दा आम आदमी पक्ष आता पंजाब निवडणुकीत उचलून धरणार आहे. तर सातत्याने पराभूत होणाऱया काँग्रेससाठी चंदीगडमधील निकाल निराशा वाढविणारा आहे.
हिमाचल पोटनिवडणुकीनंतर चंदीगडमध्येही महागाईच्या मुद्दय़ाला भाजपला सामोरे जावे लागले ओह. यापूर्वी हिमाचलमधील पोटनिवडणुकीत भाजपला एक लोकसभा तर 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. तर शेतकरी आंदोलनाचा मुद्दाही अद्याप कायम आहे. चंदीगडमध्ये प्रभाग वाढविण्यात आल्याने ग्रामीण क्षेत्र महापालिका हद्दीत सामील झाले. ग्रामीण भागात शेतकऱयांची संख्या अधिक असल्याने भाजपला फटका बसला आहे.
ग्रँड वेलकम : सिसोदिया
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत चंदीगडच्या लोकांनी आम आदमी पक्षाचे ग्रँड वेलकम केल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदीगडमधील निकाल आम आदमी पक्षाचा उत्साह वाढविणारा ठरणार आहे.
पंजाब बदलासाठी सज्ज : केजरीवाल
चंदीगड महापालिकेत आम आदमी पक्षाचा हा विजय पंजाबमध्ये होऊ घातलेल्या बदलाचा संकेत आहे. चंदीगडच्या लोकांनी भ्रष्ट राजकारण नाकारत ‘आप’च्या प्रामाणिक राजकारणाला निवडले असल्याचे उद्गार केजरीवाल यांनी काढले आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेस गटबाजीमुळे आव्हानांना तोंड देत आहे. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या गटांमध्ये काँग्रेस पक्ष विभागला गेला आहे.