भाजपच्या बालेकिल्ल्यात ठरला सर्वात मोठा पक्ष
प्रतिनिधी /पणजी
चंदीगढ महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने चंदीगढ महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रवेश केला होता आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या गडावर आपला झेंडा फडकवला आप ने महानगरपालिकेतील 14 प्रभाग जिंकले आहेत.
या ऐतिहासिक विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. चंदीगढमध्ये पक्षाचा हा विजय म्हणजे पंजाबमधील बदलाचे प्रतिक असल्याचे सांगितले. चंदीगढच्या जनतेने भ्रष्टाचार आणि कुशासन नाकारले आहे आणि आपचे प्रामाणिक राजकारण निवडले आहे.
केजरीवाल, सिसोदियांकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे ज्ये÷ नेते मनीष सिसोदिया म्हणाले की, हा विजय म्हणजे लोकांना ’प्रामाणिकपणा आणि कामाचे राजकारण’ करण्याची संधी द्यायची आहे याचे द्योतक आहे. आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय स्तरावरील विश्वासार्ह पर्याय म्हणून उदयास आला आहे. चंदीगढनंतर आता दिल्लीच्या महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष आपला झेंडा फडकवेल अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. चंदीगढ महापालिकेतील विजयाची ही लाट दिल्ली महापालिकेपर्यंत पोहोचेल, असे आपचे ज्ये÷ नेते दुर्गेश पाठक म्हणाले.
महापालिकेच्या 35 पैकी 14 जागांवर विजय
भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या चंदीगढ महापालिकेच्या 35 प्रभागांमध्ये निवडणुका झाल्या. चंदीगढ महापालिकेत आतापर्यंत फक्त भाजप आणि काँग्रेसची सत्ता होती. या निवडणुकीत आपने अभूतपूर्व कामगिरी करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले होते. अरविंद केजरीवाल यांनी चंदीगड येथे जाहीर सभेला संबोधित करताना चंदीगढच्या जनतेला आम आदमी पक्षाच्या प्रामाणिक राजकारणाला संधी देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार चंदीगढ महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला 14 प्रभागांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून देत चंदीगढच्या जनतेने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या प्रामाणिक राजकारणावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या भ्रष्टाचारावर लोक नाराज आहेत आणि त्यांच्या महापौरांचा पराभवही झाला आहे. चंदीगढ महापालिकेतील या विजयावरून पंजाब यावेळी बदलासाठी सज्ज असल्याचे दिसून येते, असे पक्षाने म्हटले आहे.
आपने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की आपने यापुर्वी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि गोवा येथे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत निवडणुका लढवल्या आणि त्यांना व्यापक पाठिंबा मिळाला. पक्षाने उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकीत 83 हून अधिक जिल्हा पंचायतीच्या जागा, 300 ग्रामपंचायतीच्या जागा आणि 232 हून अधिक क्षेत्र पंचायतीच्या जागा जिंकल्या. यासोबतच गुजरातमधील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सुरत महापालिका निवडणुकीत 18 जागा जिंकल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 300 पैकी 145 जागा जिंकल्या. हिमाचल प्रदेश पंचायत निवडणुकीत 40 उमेदवार उभे केले आणि 36 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला. जम्मू आणि काश्मीरमध्ये एक जिल्हा विकास परिषद सदस्य जागा आणि गोव्यात एक जिल्हा पंचायत सदस्य जागा जिंकली आहे.
दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही चंदीगढ महापालिकेतील दणदणीत विजय साजरा केला.