कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पक्षाच्या ध्येय धोरणावर, विकासावर बोलण्याची आवश्यकता आहे. पण विनाकारण बंटी पाटील यांच्यावर टीका होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे बंटी पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोल्हापूरची जनता फार शहाणी आहे. अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते.
पुढे मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव उमेदवार आहेत का? पालकमंत्री सतेज पाटील उमेदवार आहेत? हेच मला समजलेलं नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीला भाजप नेते सतेज पाटील यांना बिनविरोध निवडून दिले. भाजपने त्यांचा उमेदवार मागे घेतला. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका करण्यात काय अर्थ आहे? अशी प्रतिक्रिया ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
थेट पाईपलाईन वरून बोलताना मुश्रीफ यांनी, आम्हाला खोटं बोलण्याची सवय नाही. खोटं बोल पण रेटून बोल असं आम्ही करत नाही. आम्ही प्रांजळपणाने खरं बोलणारी माणसं आहोत. मात्र कोरोनाच्या काळात हे काम ठप्प होते. भारतीय जनता पार्टीच्या काळात परवानगी द्यायला उशीर झाला. कोरोनामुळे केंद्र सरकारने सर्वच कामांना एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे थेट पाईपलाईनच्या कामाला थोडा उशीर झाला आहे. मात्र या वर्षी कोणत्याही परिस्थितीत दूध गंगेचं स्वच्छ पाणी येणारच. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.