प्रतिनिधी / सातारा
रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात झालेल्या जमीनीच्या व्यवहाराचे पेपर्स माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मांडले आहेत. सोमय्यांनी यांनी केलेले आरोप बरोबरच आहेत. लोकशाहीने त्यांना अधिकार दिला आहे. नाईकांची आई आणि ठाकरे कुटुंबियांचे जमिनीचे व्यवहार झालेले आहेत. खोडणाऱ्यांनी ते आरोप खोडावेत, अशी जळजळीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, खडसेंच्याबाबत आमच्यासाठी आता प्रश्न संपला आहे. रात गयी, बात गयी, असा असून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई दिली नसल्याने त्यांचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
साताऱ्यात हॉटेल लेक ह्यु येथे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, ऍड. भरत पाटील, डॉ. सुरभी भोसले, दिलीप चरेगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही या सरकारने भरपाई दिली नाही. 25 हजार रुपये देतो म्हणाले होते. पुन्हा 10 हजार देतो म्हणाले तेही दिले नाहीत. कलेकटर कचेरींबाहेर झुणका भाकर आंदोलन झाले. तरीही अजून मदत शेतकऱयांना मिळाली नाही. त्यामुळे या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो, असे म्हणत पुढे ते म्हणाले, आमच्या कार्यकाळात मराठय़ांना आरक्षण दिले. ते या सरकारला टिकवता आले नाही. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ बरखास्त केले, अशीही त्यांनी टीप्पणी केली.
माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपाच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, मला अस वाटत नाही. सोमय्या यांनी पेपर्स मांडले आहेत. ते पेपर खोटे आहेत म्हणून कोर्टात ठाकरे आणि नाईक कुटुंबांनी कोर्टात जावं. नाईकांची आई आणि ठाकरे कुटुंबांचे जमिनीचे व्यवहार झालेले आहेत. लोकशाहीत किरीट सोमय्यांना अधिकार आहेत. सोमय्यांचे आरोप बरोबरच आहेत. खोडणाऱयांने ते खोडावे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच खडसेंच्या प्रश्नी ते म्हणाले, खडसेचा विषय आता संपला आहे. रात गयी बात गयी, एवढय़ात वाक्यात उत्तर दिले. दडपशाहीच्या प्रश्नांवर हे सरकारच सर्वसामान्य जनतेवर दडपशाही करते, असा आरोप करण्यात आला.
भाजपाचे आमदार निवडून आणा
महाराष्ट्रात तीन पदवीधर आणि दोन शिक्षक आमदारसाठी निवडणूक लागली आहे. त्यात चार ठिकाणी भाजपाने उमेदवार उभे केले आहेत. एका ठिकाणी पाठींबा दिला आहे. पुणे पदवीधरमध्ये संग्राम देशमुख, तर शिक्षकसाठी सोलापूरचे जितेंद्र पवार हे शिक्षक परिषदेच्यवतीने उभे आहेत. मी सलग बारा वर्ष या मतदार संघाचा आमदार होतो. पदवीधराच्या आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.
खासदार उदयनराजेंचे कार्यकर्ते मेळाव्यात पण राजेंची पाठ
शिक्षक आणि पदवीधरसाठी भाजपचाच आमदार निवडून आणायचा आहे. त्याकरता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.बॅनर तयार करुन जागोजागी लावा, दैनिकांमध्ये जाहीराती द्या, फोनवरुन मतदारांना सांगा, जागृती जास्तीत जास्त करा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यात केले. दरम्यान, या मेळाव्यात खासदार उदयनराजे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते परंतु ते स्वतः गैरहजर होते. या मेळाव्यास भाजपाचे सुवर्णा पाटील, विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, डॉ. उत्कर्ष रेपाळ, राहुल शिवनामे, विक्रम बोराटे यांच्यासह जिह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.