महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिहय़ातला पट्टेरी वाघ आणि मानव यांच्यातला संघर्ष विकोपाला गेल्याने वनस्पती व अभ्यासक आणि पर्यावरण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठी हा चिंतेचा विषय ठरलेला आहे. महाराष्ट्र राज्यातल्या एकूण 312 पट्टेरी वाघांपैकी 175 वाघ हे केवळ चंद्रपूर जिल्हय़ात असल्याने येथील 50 वाघांचे स्थलांतर ज्या जंगलात वाघाच्या संख्येची घनता कमी आहे तेथे व्हावे अशी मागणी होऊ लागली आहे. चंद्रपूरचे जंगल एकेकाळी वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत पोषक असा नैसर्गिक अधिवास ठरत होते परंतु गेल्या काही वर्षांपासून इथे मोठय़ा प्रमाणात आलेले कारखाने, झपाटय़ाने विस्तारणारी लोकवस्ती, मोठय़ा प्रमाणात कृषी-बागायती पिकांवरती अवलंबून असलेली लोकसंख्या आणि त्यामुळे विस्कळीत होत असलेले जंगल क्षेत्र… यामुळे चंद्रपुरातील पट्टेरी वाघांचा नैसर्गिक अधिवास असंख्य संकटांच्या वावटळीत सापडलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून पट्टेरी वाघ आणि तेथील माणूस यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला पोचलेला आहे. त्या संदर्भात अभ्यास व्हावा आणि हा संघर्ष नियंत्रित करण्यासाठी उपाय योजनेचा कृती आराखडा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने समितीची नियुक्ती करून 31 डिसेंबर 2020 पर्यंत आपला अहवाल देण्यास सांगितलेले होते.
चंद्रपूराच्या एकूण 11,443 चौरस कि.मी. क्षेत्रफळापैकी 5206 चौरस कि.मी. वनक्षेत्र असून येथील घनदाट अशा वृक्षवेलींच्या सान्निध्यात पट्टेरी वाघांचा नैसर्गिक अधिवास आहे परंतु चंद्रपुरातल्या जंगलाच्या पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्राचा काडीमात्र विचार न करता महाराष्ट्र सरकारने औद्योगिक रणाला चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या कारखान्यांना अनुमती दिली. दगडी कोळशांच्या खाणी सुरू करून औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभा करण्यास प्राधान्य दिले. जेथे कधीकाळी पट्टेरी वाघ बिनधास्तपणे संचार करायचे तेथेच औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी झाल्यावर गेल्या 5 वर्षांपासून 5 वाघांचे अस्तित्व आणि संचार असल्याचे स्पष्ट झालेले आाहे. या प्रकल्पामुळे 10,000 लोकसंख्या या परिसरात वास्तव्यास असून चंद्रपूरची लोकसंख्याही 5 लाखांवरती पोचलेली आहे. चंद्रपुरात भटक्या गुरांची संख्या 2 ते 4 हजारांच्या आसपास असून एरवी तृणहारी जंगली श्वापदांवरती गुजराण करणाऱया वाघांनी इथे सहजपणे आपल्या भक्ष्यस्थानी पडणाऱया गुरांवर हल्ले करून त्यांच्या मांसावर ताव मारण्याची चटक लावून घेतलेली आहे. आपल्या पारंपरिक अन्नाच्या स्रोतांवरती चंद्रपूर आणि परिसरात दुर्भिक्ष भासू लागल्याने वाघांनी भटक्या गुरांकडे शिकार म्हणून लक्ष केंद्रीत केलेले आहे. मृग कुळातल्या जंगली श्वापदांपेक्षा भटक्या गुरांची शिकार करणे सहज शक्य असल्याने वाघांनी माणसांनी गजबजलेल्या ठिकाणी ठाण मांडण्यात धन्यता मानलेली आहे. 2020 या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात वाघांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 31 जणांना मृत्यू झाल्याने मानव आणि वाघ यांच्यातला संघर्ष विकोपाला गेल्याची चिन्हे स्पष्ट झालेली आहेत. 2014 नंतर संपूर्ण देशात महाराष्ट्रात मानव-वाघ यांच्यातल्या संघर्षात सर्वाधिक मृत्यूची प्रकरणे उद्भवलेली आहेत. वाघांच्या हल्ल्यात एका वर्षात 31 व्यक्तींचा मृत्यू होणे ही आकडेवारी महाराष्ट्रातल्या दशकभरात वाघ-मानव यांच्यातल्या संघर्षातली मोठी आहे. 2010 पासून 2020 पर्यंत वाघांच्या हल्ल्यात 153 व्यक्ती मृत्यूमृखी पडलेल्या आहेत.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्तपणे हाती घेतलेल्या अभ्यासानुसार 2018-19 या कालखंडात चंद्रपूरच्या जंगलात मानव-वाघ यांच्यातला संघर्ष विकोपाला पोहोचला. महाराष्ट्रातल्या 312 वाघांपैकी 175 वाघ चंद्रपुरात असून त्यातील 82 वाघ ताडोबा-अंधेरी व्याघ्र राखीव क्षेत्रात, 23 मध्य चांदय़ात, 31 वाघ पांढर कवडय़ासह चंद्रपूरच्या जंगलात आणि 39 वाघांचे वास्तव्य ब्रह्मपुरीच्या जंगलक्षेत्रात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. चंद्रपूर जिल्हय़ात 2016 साली जेव्हा वाघांकडून 5 व्यक्तींना मृत्यू आला तेव्हाच महाराष्ट्र वनखात्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने उपाययोजना आखली असती तर मानव-वाघ यांच्यातल्या बिघडत्या संघर्षाचा आलेख नियंत्रणाखाली आला असता परंतु या बाबीचा गांभीर्याने विचार झाला नसल्याने 2017 साली वाघांनी 11 जणांची, 2018 मध्ये 17 तर 2019 मध्ये मृत्यूची संख्या 24 वरती पोहोचली. 2020 साली महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यात जे 31 मृत्यू उद्भवले होते त्यापैकी 26 जण हे एका चंद्रपूर जिल्हय़ातले होते. यावरून या संघर्षाची तीव्रता लोकसभेच्या पटलावरती प्रकर्षाने जाणवली.
2006 पासून महाराष्ट्र राज्यात वाघांची जी संख्या 103 होती ती 2010 साली 168 झाली. 2014 मध्ये त्यात वाढ होऊन ही संख्या 190 तर 2018-19 मध्ये ती 312 झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. 2010 ते 2020 या दशकात महाराष्ट्रात 467 जणांचे मृत्यू जंगली श्वापदांच्या हल्ल्यात झाल्याचे उघडकीस आलेले आहे. यापैकी वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या लक्षणीय झालेली आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या काळात मार्च ते मे महिन्यात वाघांच्या हल्ल्यात 11 जणांना मृत्यू आलेले आहेत.
मानव-वाघ यांच्यातल्या संघर्षाला कारणीभूत ठरलेले 5 वाघ जेरबंद केल्याचा दावा सरकारने केलेला आहे. यापैकी यवतमाळ आणि गोंदिया येथील प्रत्येकी एक वाघ असून उर्वरित चंद्रपुरातले आहेत. गडचिरोली, भंडारा, नागपूर या जिल्हय़ातही वाघांच्या हल्यात मृत्यू उद्भवलेले आहेत. हे खरंतर महाराष्ट्र राज्यातला जंगली श्वापदांचा नैसर्गिक अधिवास संकटग्रस्त झाल्याचे द्योतक आहे. ताडोबा-अंधेरी व्याघ्र राखीव क्षेत्राला त्या परिसरातल्या दगडी कोळशाच्या खाणींचा जबरदस्त फटका बसलेला असून त्यामुळेच पट्टेरी वाघांच्या नैसर्गिक अधिवासाबरोबर संचारक्षेत्राच्या मार्गात अडचणींचे डोंगर उभे राहिलेले आहेत.
आज आपण मानवी समाजाला केंद्रभूत मानून विकासाचा रथ चौखूर उधळलेला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाशी पूर्वापार असलेले ऋणानुबंध विस्कळीत केलेले आहेत. नोकरी, उद्योगधंदे यांच्या अभिवृद्धीसाठी वन्यजीवांच्या अधिवासाची आणि वास्तव्याची बेदखल वाढू लागलेली आहे अणि त्यामुळे भारतीय संस्कृतीची आणि जंगलाची शान असणाऱया ढाण्या वाघांना चंद्रपूरच्या जंगलातून हद्दपार करण्यासाठी सिद्ध झालेल्यांची संख्या वाढत आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या परिसरातदेखील श्वापदांचे भक्ष्य मिळणे दुरापास्त ठरत असल्याने वाघांनी भटक्या गुरांवरती आणि माणसांवरती हल्ले आरंभलेले आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी वनखाते आणि समाज यांनी सामंजस्याने प्रयत्न केले नाहीत तर तणाव आणखी शिगेला पोहोचेल.