अनसुरकर गल्ली येथील प्रकार, नागरिकांनी विरोध करताच काम थांबविले
प्रतिनिधी/ बेळगाव
अनसुरकर गल्ली येथे चक्क गटारीमधून विद्युत वाहिन्या घालण्यात येत होत्या. रस्त्याच्या बाजूला चर खोदून विजवाहिन्या घालाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. परंतु संबधित कर्मचाऱयांनी उद्धट उत्तर दिल्याने रहिवाशांनी काम बंद पाडले. अधिकाऱयांनी दुर्लक्ष होत असल्याने कंत्राटदार मनमानी कारभार करीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
घरापर्यंत विजेचा पुरवठा देण्याचे काम मणिपाल येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून शनिवारी अनसुरकर गल्ली येथे विजवाहिन्या घालण्याचे काम सुरू होते. परंतु गटारीमधून वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. पावसाळय़ात यामध्ये कचरा अडकणार असून विजेचाही धोका संभवतो आहे. गटारीची स्वच्छता करताना जर वाहिनीला स्पर्श होवून अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
परंतु कंपनीच्या कर्मचाऱयांनी नागरिकांना उद्धट उत्तरे दिली. आम्हाला चर मारून वाहिन्या घालण्याचे सांगण्यात आलेल्या नसल्याने आम्ही असेच काम करणार असे सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अखेर हे काम बंद पाडले. चर खोदून विजवाहिन्या घालण्यास आमची कोणतीच तक्रार नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा भोंगळ कारभाराचे चित्र समोर आले आहे.