प्रतिनिधी/बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत माळमारुती परिसरातील रस्त्यांचे काम सुरू करून दोन वर्षे झाली, पण अद्यापही येथील कामे पूर्ण झाली नाहीत. ही कामे करताना कोणतेच नियोजन नसल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. चक्क डेनेज वाहिनीवर गटार बांधण्यात आली असून ठिकठिकाणी गटारीमध्येच डेनेज चेंबर आल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
दक्षिण भागातील विकासाबरोबरच उत्तर भागातील रस्त्यांचा विकास करण्यात येत आहेत. प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर शिवबसवनगर येथील रस्त्यांचा विकास करून स्मार्ट रोड बनविण्यात आला. तब्बल अडीच वर्षांनंतर रस्त्याचे काम पूर्ण झाले. याच दरम्यान उत्तर भागात विविध रस्त्यांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेमध्ये करण्यात आला. प्रामुख्याने वंटमुरी कॉलनी आणि माळमारुती परिसरातील रस्त्यांचा विकास योजनेंतर्गत करण्यास दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. पण हे काम अन्य कामांप्रमाणे अर्धवट स्थितीत आहे. बेळगाव, शहापूर याप्रमाणे माळमारुती परिसरदेखील महत्त्वाचा आहे. श्रीनगर उद्यान ते वंटमुरी आश्रय कॉलनीपर्यंतचा रस्ता खुपच वर्दळीचा आहे. त्यामुळे या रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, अन्य कामे अर्धवट असल्याने समस्यांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. सदर कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अर्धवट कामे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा परिसर स्मार्ट बनणार का? असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत. श्रीनगर उद्यानासमोरील चौकात वाहनांची आणि नागरिकांची गर्दी नेहमीच असते. त्यामुळे येथील सर्व कामे पूर्ण करून रस्ता खुला करणे ही स्मार्ट सिटी कंपनीची व कंत्राटदाराची जबाबदारी आहे. पण याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे आणि कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाले आहे. उद्यानासमोरील दुभाजकाचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फुटपाथ बांधण्याचे आणि सायकल ट्रकचे काम आता करण्यात येत आहे. काही ठिकाणी फुटपाथशेजारी असलेल्या विविध वाहिन्यांच्या डक्टला भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या व्यापारी संकुलासमोर उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याचप्रमाणे दुभाजकाचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी झाडे लावण्यासाठी माती घालण्यात येत आहे. मात्र काँक्रिटीकरणासाठी खोदण्यात आलेली रस्त्यावरील माती दुभाजकामध्ये झाडांसाठी घालण्यात येत आहे. त्यामुळे त्यामध्ये दगड, विटांचे तुकडे आणि रस्त्यावरील डांबराचे तुकडे आढळून येत आहेत. अशा मातीमध्ये झाडे उगवणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. झाडांसाठी पोषक माती असणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकंदर कामे रेटून नेण्याचा प्रकार दिसून येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील कामे दर्जेदार आणि टिकावू करण्यासाठी क्लास-वन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. पण प्रत्यक्षात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे क्लास-वन दर्जाची नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. वंटमुरी आश्रय कॉलनीपासून कणबर्गी रोडपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा जलवाहिन्या तसेच विविध वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. याकरिता घरांसमोर चरी खोदण्यात आल्या आहेत. पण सदर कामदेखील अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी प्रवेशद्वारापर्यंत माती पडली असल्याने दरवाजा उघडताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ही अर्धवट कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. दुसऱया बाजूचे काम अद्यापही सुरू केले नाही.
चेंबरच्या लोखंडी सळय़ा नागरिकांना धोकादायक
काही ठिकाणी बांधण्यात आलेल्या चेंबरच्या लोखंडी सळय़ा नागरिकांना धोकादायक ठरत आहेत. येथील फुटपाथ बांधणीचे काम अद्याप अपूर्ण आहे. कणबर्गी रोडपासून वंटमुरी आश्रय कॉलनी, तेथून श्रीनगर उद्यानपर्यंतच्या रस्त्यावर जिकडे तिकडे मातीचे ढिगारे साचले असून रस्त्याशेजारी खोदाईचे सत्र सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. वंटमुरी परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रुग्णालयाची उभारणी केली आहे. त्या ठिकाणी सध्या कोविड सेंटर सुरू केले आहे. पण मुख्य रस्त्यावरून या रुग्णालयाकडे जाणाऱया रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे रुग्णवाहिका किंवा नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात जाण्यासाठी दुसऱया मार्गाचा वापर करावा लागत आहे. अशा विविध समस्यांचा डोंगर या परिसरात निर्माण झाला आहे.