समुद्रीय क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे निर्माण होणारी चक्रीवादळे अतिशय घातक असतात. नुकताच भारताला ‘तौक्ते’ आणि ‘यास’ या वादळांचा तडाखा बसला. भूतकाळातही अशा अनेक चक्रीवादळांनी जमिनीवर हल्ले चढविलेले आहेत आणि या हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात मानवी जिवीतहानी झालेली आहे.
अलीकडच्या काळात मात्र वादळे पूर्वीइतकीच तीव्र असली तरी जिवीतहानी मोठय़ा प्रमाणावर होत नसल्याचे अनुभवास येते. या वादळांमध्ये पूर्वी हजारो माणसे मारली जात. तेवढय़ाच तीव्रतेच्या वादळांमध्ये अलीकडे जिवीतहानी अत्यंत अल्प असते. याला कारण भारतीय संशोधकांनी शोधलेले तंत्रज्ञान हे आहे. वादळांची निर्मिती आणि त्यांच्या प्रवासाची दिशा यांचे अचूक अनुमान आधीच व्यक्त करणारे हे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे सागरात वादळाची निर्मिती झाल्यानंतर त्याचा सागरतटाकडे प्रवास सुरू होतो. तेव्हाच त्या वादळाचा केंद्रबिंदू सागरतटावरील कोणत्या भागात प्रवेश करणार आहे, हे या तंत्रज्ञानामुळे समजते. परिणामी या भागाचा परिसर आणि आसपासच्या प्रदेशातील माणसांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी पर्याप्त वेळ उपलब्ध होतो. त्यामुळे वादळाच्या तडाख्यातून बहुतेकांना वाचविले जाऊ शकते. उपग्रहांच्या सक्षम कॅमेऱयांमधून सागरात घडणाऱया हवामानविषयक घडामोडींवर अखंड लक्ष ठेवले जाते आणि त्यातूनच कमी दाबाचे क्षेत्र त्वरित ओळखता येते. वादळाची निर्मिती झाल्यानंतर त्याची दिशाही संगणकाद्वारे ओळखली जाऊ शकते. परिणामी हानीच्या प्रमाणावर नियंत्रण मिळविता येते.