वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार मंत्र्यांना निवेदन
वार्ताहर / वेंगुर्ले:
तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱयावर आलेले राज्याचे सहकारीमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरासह तालुक्यातील शेती-बागायतीचे पंचनामे होत नसल्याचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असता श्री. पाटील यांनी थेट अधिकाऱयांना संपर्क साधून तातडीने शेती-बागायतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
वेंगुर्ले तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश कृषी विभागात देण्याबाबतची मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा सदस्य नितीन कुबल यांनी वेंगुर्ले दौऱयाच्या सुरवातीलाच केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, प्रदेश महिला सचिव सौ. नम्रता कुबल, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, व्हिक्टर डॉन्टस, भास्कर परब, वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष ऍन्थोनी डिसोझा, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सुनील भोगटे, तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर, माजी तालुका उपाध्यक्ष बावतीस डिसोझा यासहीत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सहकार व पणनमंत्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात, तौक्ते चक्रीवादळामुळे वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील शेतकरी बागायतदार यांचा जीवनचरितार्थ असलेल्या आंबा, काजू, नारळ (माड), फणस, कोकम, केळी यांसह फळ उत्पन्न देणारी झाडे मोठय़ा प्रमाणात मोडून नुकसान झाले आहे. मात्र, पंचनाम्याचे काम कृषी विभागाकडून हलत डुलत होत असून अनेक ठिकाणी अद्यापही कृषी विभागाचे पर्यवेक्षक सर्व भागात कार्यरत असतानाही पंचनामे करण्यास सुरू झाली नाही. मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेल्या या भागातील बागायतदारांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर तातडीने करण्याचे आदेश द्यावेत. तसेच पंचनाम्याअंती शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. याबाबतची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.