प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा शासकीय रूग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दि. 30 ऑगस्टपासून बेमूदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलन सुरू करून तीन दिवस झाले पण या आंदोलनाची कोणत्याही अधिकारी वर्गांनी दखल किंवा साधी विचारपूस ही केली नाही, त्यामुळे आता उग्र आंदोलनाचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सन 2020 पासून कोरोना महामारीशी लढा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे जिल्हा शासकीय रूग्णालयात प्रशासनाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाअंतर्गत वर्ग 4 मधील जिल्हय़ातील रिक्त पदे भरण्यात यावी, अनुकंपा तत्वावरील चालु वर्षातील नेमणूका तात्काळ करण्यात याव्यात, 10 ते 30 वर्षानंतरची मिळणारी अश्वाशित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे फरकाप्रमाणे वेतन देण्यात यावे, जिल्हय़ातील विविध शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय बिलाचे प्रस्ताव सादर केले असता 5 ते 6 महिण्याचा कालावधी झाला तरी मिळत नाहीत. भविष्य निर्वाह निधीतून रक्कमेची मागणी केल्यास तात्काळ मिळावी, दुय्यम सेवा पुस्तक भरून मिळावीत आदी प्रलंबित मागण्यांसाठी चतुर्थ कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.