अतिवृष्टी व कडाक्याच्या उन्हामुळे मळय़ांची पझडझ
प्रतिनिधी /फोंडा
चतुर्थीला गणपतीसमोर माटोळीला बांधायला गावठी चिबुड बहुतेक गोमंतकीयांना लागतोच. शिवाय जेवणाच्या पानात गावठी दोडक्याची भाजी व प्रसादाला गावठी काकडीही लागते. चतुर्थीच्या माटोळी बाजाराला यंदा ही मळय़ातील फळे व गावठी भाजी कमीच मिळण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात झालेली पावसाची अतिवृष्टी व मध्यंतरी पडलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे फोंडा तालुक्यातील बहुतेक भाजीचे मळे झडून गेले आहेत.
जुलै महिन्याच्या मध्यावर सलग दहा दिवस कोसळलेला जोरदार पाऊस व त्यानंतर पडलेल्या कडाक्याच्या उनामुळे बेतोडा, फर्मागुडी, बांदोडा, प्रियोळ, सावईवेरे आदी भागातील बहुतेक भाजीच्या मळय़ांची पडझड झाली आहे. चिबुड व अन्य भाज्यांचे वेल कोमेजल्याने चतुर्थी बाजारात मळय़ांतील फळे दुर्मिळच असतील. आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात व श्रावण्याच्या पुर्वार्धात रिमझिम पाऊस व श्रावणातील हलके ऊन मळय़ांच्या वाढीसाठी पोषक असते. यंदा या हवामानाने दगा दिल्याने त्याचा परिणाम या हंगामी पिकावर झाल्याचे मळेवाले शेतकरी सांगतात. अतिवृष्टीच्या तडाख्यातून उरल्यासुरल्या पिकांवर गवेरेडे व माकडांच्या टोळय़ा तुटून पडत असल्याने बेतोडा व सावईवेरे भागातील मळय़ांमध्येही चतुर्थीसाठी काहीच उरलेले नाही. चतुर्थीचा सणही यंदा पंधरा दिवस पुढे गेल्याने रानातील कांगले, माट्टे, कात्रे हे इतर साहित्यही झडून गेल्याने तेही बाजारात कमीच येण्याची शक्यता आहे.
गावठी चिबडांना मागणी, पण वेलच कोमेजले
बोकडबाग बांदोडा येथील सुभाष गावडे या शेतकऱयाने गेल्यावर्षी शंभर ते दिडशे गावठी चिबुड बाजारात आणले होते. यंदा त्याच्या मळय़ात नावालाही चिबुड शिल्लक राहिलेले नाही. पावसाच्या अतिवृष्टीमुळे व नंतर पडलेल्या कडाक्याच्या उनामुळे या फळाच्या वेली कुजून गेल्या. ज्या शेतकऱयांच्या मळे डोंगर टेकडीच्या उतारावर आहेत, तेवढेच काही प्रमाणात शिल्लक राहिले आहेत. यंदा निव्वळ गावठी चिबुड मिळणे कठीण आहे. त्यामुळे काणकोण, सांगे, किंवा कुमठा कारवार येथून येणारे चिबुड माटोळीला बांधावे लागतील. गावठी काकडय़ा व दोडक्यांचे वेलही या अतिवृष्टीमुळे झडून गेले आहेत. फोंडा भागात लागणारे चिबुड चवीला चांगले असल्याने त्यांना जास्त मागणी असते. मात्र ते पिकल्यानंतर किमान एक दिवसच टिकतात, असे काही शेतकऱयांनी सांगितले.
शिल्लक राहिलेल्या पिकांवर वन्यप्राण्यांच्या धाडी
सावईवेरे येथील कांता खेडेकर यांचा मळा मधलावाडा येथील अनंत देवस्थानजवळ आहे. त्यांच्या मळय़ात काही प्रमाणात चिबुड शिल्लक आहेत. मात्र माकड व अन्य रानटी प्राण्यांमुळे चतुर्थीपर्यंत ते शिल्लक राहतील अशी आशा त्यांना वाटत नाही. अतिवृष्टीमुळे शिल्लक राहिलेले चिबुड काही विशिष्ट प्राण्यांकडून अर्धवट खावून खराब केले जातात, असे त्यांनी सांगितले.
बेतोडा येथील रमाकांत गावकर या शेतकऱयानेही मध्यंतरी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे व त्यानंतर पडलेल्या कडक उन्हात मळा करपून गेल्याचे सांगितले. चतुर्थी सोडाच श्रावण महिन्यातच गावठी काकडय़ा व दोडकी कुजून गेली. वेलींना जेव्हा फुले येतात तेव्हा सलग पाऊस पडल्याने त्यात पाणी राहून ती गळून पडतात. चिबुडाच्या वेलीही खुडून गेल्याने बेतोडय़ातून चतुर्थीच्या बाजाराला ही पारंपारिक फळे कमीच येतील.
पाडल बेतोडा येथील महादेव गावकर या शेतकऱयाच्या कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पूर्वापार दोडकी, गावठी काकडय़ा व चिबूड लावले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये गवेरेडे व माकडांनी उच्छाद मांडल्याने बहुतेक पीक जनावरेच फस्त करतात. चिबुड, दोडकी व गावठी काकडय़ा सोडून काही प्रमाणात कारली, पडवळ शिल्लक आहेत. तेच माटोळीच्या बाजारापर्यंत टिकवून ठेवण्याची त्यांनी धडपड चालली आहे. गावठी काकडीचे वेल पंधरा दिवसांपूर्वीच करपून गेल्याने तिही माटोळीच्या बाजारात मिळणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. कोडार भागात काही शेतकऱयांनी चिबुडांचे पिक घेतले असून चतुर्थीपर्यंत ते शिल्लक राहिल्यास काही प्रमाणात ते उपलब्ध होऊ शकतील असे काही शेतकऱयांनी सांगितले.