प्रतिनिधी / बेळगाव
शहरात जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी जलवाहिनींना गळती लागून पाण्याचा अपक्यय होण्याचे प्रकार वाढले आहेत. लागलेल्या गळत्या रोखण्यात पाणीपुरवठा मंडळ अपयशी ठरताना दिसत आहे. बुधवारी चन्नम्मा सर्कलमध्ये जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाण्याचा प्रकार घडला.
या चौकात पादचाऱयांबरोबर वाहनधारकांची सतत ये-जा असते. त्यामुळे परिसर गजबजलेला असतो. मुख्य चौकात जलवाहिनीला गळती लागल्याने वाहने घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला होता. शहरात जलवाहिन्यांना गळती लागून सतत कुठे ना कुठे पाणी वाया जात असते. मात्र, याबाबत पाणीपुरवठा मंडळ उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे मनपाच्यावतीने ‘पाणी अडवा पाणी जिरवा,’ ‘पाण्याचा अपव्यय टाळा’ असे सांगून पाणी बचतीसाठी आवाहन केले जाते. दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा मंडळाकडून या आवाहनाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी वारंवार जलवाहिन्या फुटून किंवा नादुरुस्त होऊन लाखो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार सतत घडत आहेत. पाणीपुरवठा मंडळाने तातडीने दाखल होऊन जलवाहिन्यांच्या दुरुस्त्या वेळेत कराव्यात, अशी मागणी होत आहे.