27 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचा निर्णय : कर्फ्युमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था
प्रतिनिधी / बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाने रद्द झालेल्या परीक्षा मंगळवार दि. 27 एप्रिलपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे नाईट व विकेंड कर्फ्युमुळे गोंधळात पडलेल्या विद्यार्थ्यांचा या परीक्षांमुळे गोंधळ अधिकच वाढला आहे. पदवी व पदव्युत्तर परीक्षा विद्यापीठाने जाहीर केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
एप्रिल महिन्याच्या दुसऱया आठवडय़ापासून चन्नम्मा विद्यापीठाच्या पहिल्या, तिसऱया व पाचव्या सेमीस्टरच्या परीक्षा होणार होत्या. परंतु 7 एप्रिलपासून परिवहन कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या
होत्या.
परिवहन कर्मचाऱयांनी 21 एप्रिल रोजी संप मागे घेतल्यानंतर परीक्षांचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पदवीच्या पहिल्या, तिसऱया, पाचव्या सेमीस्टर व पदव्युत्तरच्या पहिल्या व तिसऱया सेमीस्टरच्या परीक्षा दि. 27 एप्रिलपासून घेतल्या जाणार आहेत. बेळगावसह विजापूर व बागलकोट जिल्हय़ांमधील परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच महाविद्यालयांना वेळापत्रक पाठविण्यात आले आहे.