अर्धवट विकासकामांचा नागरिकांना फटका : फुटपाथवर पेव्हर्स बसविले नसल्याने समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा विकास करण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी अर्धवट विकासकामे राबविण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे. येथील चन्नम्मा सर्कलमधील कन्नड साहित्य भवनच्या जवळ फुटपाथचे काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आल्याने पादचाऱयांना समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे फुटपाथ नागरिकांसाठी आहे की आणखी कशासाठी, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
शहरातील बहुतांश ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. या अर्धवट विकासकामांचा नागरिकांना फटका बसत आहे. काही ठिकाणी रस्ते, गटारांचे बांधकाम, डेनेजचे काम, पथदीप आणि फुटपाथचे काम अर्धवट स्थितीत असलेले निदर्शनास येत आहे. चन्नम्मा सर्कलमधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, फुटपाथवर पेव्हर्स बसविण्यात न आल्याने पादचाऱयांना समस्या निर्माण झालेली आहे.
येथील कन्नड साहित्य भवनच्या समोरील फुटपाथवर अर्धवट स्थितीत पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यापुढील फुटपाथ तसाच असल्याने येथून नागरिकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. फुटपाथचे काम करण्याकरिता खडी, दगड, चिपींग टाकण्यात आले असून त्यामध्ये गवत उगवले आहे.
पादचाऱयांच्या सोयीसाठी फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, फुटपाथ नागरिकांना उपलब्ध करून देण्याऐवजी त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येथील फुटपाथचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.