बेळगाव विधानपरिषद निवडणूक निकाल : कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी : महांतेश कवटगीमठ यांची हॅट्ट्रिक हुकली
प्रतिनिधी /चिकोडी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या तसेच जिल्हय़ात अस्तित्वाच्या व प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. यामध्ये काँग्रेस बरोबर अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवारास पराभवाचा धक्का दिला. काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी मोठे मताधिक्य मिळवित प्रथम क्रमाकांचा विजय मिळविला. तर दुसऱया क्रमांकासाठी झालेल्या अटीतटीच्या लढाईत अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी विजय मिळवित भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना धोबीपछाड दिला.
बेळगाव जिल्हय़ातील विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मंगळवारी चिकोडी येथील आर. डी. महाविद्यालयात मतमोजणी करण्यात आली. काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांनी पहिल्या प्राधान्य मतांच्या मोजणीतच 3718 मतांनी तर अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी पहिल्या प्राधान्य मतात 80 चे मताधिक्मय व नंतरच्या मतांतही आघाडी घेत 2975 मतांसह विजय मिळविला. भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना 2787 मते मिळाली.
या निवडणुकीत जिल्हय़ात भाजपचे 15 आमदार असूनही भाजप उमेदवाराचा पराभव भाजप श्रे÷ाrंना जिव्हारी लागणारा ठरला आहे.
दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी विधानपरिषदेसाठी प्रत्येकी एक उमेदवार दिले होते, पण अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून दोन्ही पक्षांची झोप उडाली होती. जारकीहोळी आमदार द्वयींनी काँग्रेस उमेदवाराच्या पराभवासाठी अपक्ष उमेदवार उभा केल्याचे सांगितले होते. प्रारंभी काँग्रेसलाच याचा फटका बसेल असा अंदाज वर्तविण्यात येत होता, पण निवडणुकीच्या मतमोजणीत याचा फटका भाजपालाच बसल्याचे स्पष्ट झाले. दोनवेऴा विधानपरिषदेत भाजपाकडून प्रतिनिधीत्व केलेल्या महांतेश कवटगीमठ यांचा पराभव झाला, तर नव्याने राजकारणात प्रवेश करु इच्छिणाऱया चन्नराज हट्टीहोळी व लखन जारकीहोळी यांना राजकारणात प्रवेश मिळाला.
चन्नराज पहिल्या प्राधान्यक्रमाच्या मतातूनच विजयी झाले, तर विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या वाटेवर असलेल्या कवटगीमठ यांना पहिल्या प्राधान्यक्रमाची अधिक मते मिळविण्यात अपयश आले. सकाळी 8 पासून मतपत्रिकांच्या विभागणीस प्रारंभ करण्यात आला. 12.30 वाजता पहिल्या प्राधान्यक्रमाच्या मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीतच विजयी झाल्यानंतर चन्नराज हट्टीहोळी हे मतदान केंद्रातून विजयोत्सव साजरा करत बाहेर पडले. पहिल्या फेरीत लखन जारकीहोळींनीही आघाडी घेतल्याने एकाचवेळी काँग्रेस व लखन यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर विजयोत्सव सुरु केला. दुपारनंतर महांतेश कवटगीमठ यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन झाले. दुसऱया फेरीतील मतमोजणीतही पिछेहाट होत असल्याचे निदर्शनास येताच ते मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. जिल्हय़ात भाजपाचे 15 आमदार, 2 खासदार, एक राज्यसभा सदस्य असूनही प्रथम प्राधान्यक्रमांची कमी मते कवटगीमठ यांना पडल्याने त्यांचा पराभव झाला.
पहिल्या प्राधान्यक्रमाची 152 मते बाद
पहिल्या प्राधान्यक्रमाच्या मतांची मोजणी करताना 152 मते बाद ठरविण्यात आली. उमेदवारांच्या विजयासाठी 2899 मॅजिक मते घेणे आवश्यक होते. 3718 मते पहिल्या फेरीतच मिळवून चन्नराज हट्टीहोळी यांनी विजय मिळविला, तर पहिल्या प्राधान्यक्रमाची 2522 मते मिळवून लखन जारकीहोळी दुसऱया क्रमांकावर पोहचले. भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना पहिल्या फेरीत 2432 मते मिळाली. जारकीहोळी व कवटगीमठ यांच्यातील एका उमेदवाराच्या निवडीसाठी दुसऱया प्राधान्यक्रमांच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यातही लखन यांनी बाजी मारल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
बंधूंना विजयी करण्यात जारकीहोळी, हेब्बाळकर यांना यश
या निवडणुकीत लखन यांच्या विजयासाठी रमेश व भालचंद्र प्रयत्नशील होते. तर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आपले बंधू चन्नराज यांच्या विजयासाठी प्रयत्नशील होत्या. रमेश जारकीहोळी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करणार असा पण करुन कामास लागल्याने हेब्बाळकर यांची प्रति÷ा पणास लागली होती. जारकीहोळी व हेब्बाळकर यांचे बंधू परस्पर विरोधी निवडणूक लढवित असतानाही दोघांच्याही बंधूंना निवडणुकीत विजय मिळवून देण्यात त्यांना यश मिळाले. अभ्यासू व शिस्तबद्ध नेते म्हणून नावलौकीक असलेल्या महांतेश कवटगीमठ यांना गेल्या 12 वर्षात अनेक विकासकामे करुनही पराभव पत्करावा लागला.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते
चन्नराज हट्टीहोळी (काँग्रेस)-3718
लखन जारकीहोळी (अपक्ष)-2975
महांतेश कवटगीमठ (भाजपा)- 2787