अनेक रात्री झोप न लागल्याने बरळत आहेत चन्नी
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाब सरकारवर सुरक्षेच्या मुद्दय़ावरून शाब्दिक हल्ला चढविला आहे. मुख्यमंत्री चन्नी यांच्या मानसिक स्थितीवरही त्यांनी सवाल केला आहे. चन्नी अनेक रात्री झोपू शकलेले नाहीत, त्यांना केजरीवालांचे भूत सतावत आहे. याचमुळे दिवस उजाडल्यापासून रात्रीपर्यंत चन्नी हे मला शिव्या देत आहेत. पंजाबमध्ये लोकांना सुरक्षित वाटत नाही. महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढले आहेत. अवमानाच्या अनेक घटना उघडकीस आल्याचे केजरीवाल म्हणाले.
सीमेपलिकडून अमली पदार्थांची तस्करी होतेय. टिफिन बॉम्ब आणि शस्त्रास्त्रs पोहोचत आहेत. मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते, तेव्हाही त्यात कस्टम अधिकाऱयांनी लाच घेत आरडीएक्सची वाहतूक करून दिल्याचे समोर आले होते. पंजाबमध्येही असाच प्रकार घडत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येताच केंद्रासोबत मिळून सीमेपलिकडून होत असलेली अमली पदार्थांची तस्करी रोखू. केवळ आम आदमी पक्ष हाच एक प्रामाणिक पक्ष असून तो सुरक्षा पुरवू शकतो आणि भ्रष्टाचार संपवू शकतो. परंतु सर्व पक्ष एकत्र होऊन केवळ आम आदमी पक्षाला पराभूत करू पाहत असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
पंजाबमधील सर्व राजकीय पक्ष मला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेत्या प्रियंका वड्रा, अकाली दल आणि चरणजीत सिंह चन्नी हे मला शिव्या देत आहेत. 70 वर्षांपासून पंजाबला लुटणाऱया पक्षांना आम आदमी पक्षाच्या विजयाची भीती सतावू लागली आहे. त्यांना लूट बंद होण्याची भीती असल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे.
मद्य अन् पैसे वाटपाचा खेळ
निवडणुकीला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने केवळ मद्य आणि पैसे वाटण्यास सुरुवात होणार आहे. परंतु यंदा दिशाभूल होऊ देऊ नका असे लोकांना आवाहन करत आहे. सर्वांनी मिळून झाडूचे बटनच दाबा असे केजरीवालांनी पंजाबमधील जनतेला उद्देशून म्हटले आहे.