प्रशासनाचा निर्णय, बचावकार्य थांबविले
डेहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंड राज्याच्या चमोली येथे झालेल्या जलप्रलय आपत्तीतील 130 बेपत्ता नागरीकांचा इतक्या दिवसांनंतरही ठावठिकाणा न लागल्याने त्यांना बेपत्ता घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाने आता बचावकार्य थांबवले असून बेपत्ता नागरीक जिवंत असण्याची शक्यता दुरापास्त असल्याचे स्पष्ट केले आहे. ही दुर्घटना हिमकडा नदीत कोसळल्याने 7 फेब्रुवारीला घडली होती.
आतापर्यंत या दुर्घटनेत सापडलेल्यांपैकी 68 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर 88 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. हिमकडा कोसळल्याने अचानक नदीचे पाणी वाढून ते बाजूच्या बोगद्यात शिरले होते. त्यावेळी बोगद्यात 100 हून अधिका कामगार काम करीत होते. त्यांच्यापैकी 25 हून अधिक जणांना वाचविण्यात आपत्तीनिवारण दलांना यश आले. तथापि, कठीण परिस्थितीमुळे बोगद्यात खोलवर शिरून बचावकार्य करणे शक्य झाले नव्हते.
सर्वसाधारण नियमांच्या अनुसार एखादी व्यक्ती सलग सात वर्षे अज्ञातवासात असेल तरच तिला मृत घोषित करण्यात येते. मात्र चमोली दुर्घटनेसंबंधी जन्म आणि मृत्यू नोंद कायद्याच्या अनुच्छेदांनुसार ही घोषणा आधी करता येणे प्रशासनाला शक्य आहे. त्याप्रमाणे हे सर्व 130 नागरीक मृत झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, अधिकृतरित्या त्यांना नियमानुसार प्रथम बेपत्ता घोषित करावे लागते. त्यानुसार प्रशासनाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.