‘चराती चरतो भगः’ चा अर्थ आहे, चालणाऱयाचे भाग्य चालते. लॉकडाऊनच्या काळात हे भाग्य दुर्मिळ झाले आहे. हरिदासला एरव्ही व्यायामाचा जाम कंटाळा. पण एखाद्याला अमुक गोष्ट करू नको म्हटलं की तीच गोष्ट आवर्जून करावीशी वाटते. लॉकडाऊनचे दिवस आले आणि हरिदासला घरात बसून करमेनासं झालं. सतत फिरायला जावंसं वाटू लागलं. हरिदास दिवसभर घरात चरायचा. बायको हौसेने त्याला चांगलंचुंगलं करून खाऊ घालायची. पण या चरण्याखेरीज संस्कृत चरणे म्हणजे चालण्याची हरिदासला तीव्र इच्छा होऊ लागली.
त्यांच्या सोसायटीपासून दोन चौक ओलांडले की पदपथावर भाजीवाले बसत. रोज हरिदास तिथून भाजी घेऊ लागला. गरजेपेक्षा जराशी जास्त. कारण येताना वाटेत एक इमारत लागायची. तिथं त्याची बालमैत्रीण वृंदा राहते. भाजी घेतल्यावर तो तिला मिस्ड कॉल देई. तो तिच्या इमारतीसमोर पोचेतो ती खाली आलेली असे. अघळपघळ गाऊन आणि तोंडावर मास्क. तो तिला पिशवीतली भाजी देई. दोघे मास्कच्या आतूनच गुड मॉर्निंग, कशी/कसा आहेस, भाजीबद्दल धन्यवाद वगैरे बोलत आणि निरोप देत-घेत.
नंतर लॉकडाऊनची शिस्त कडक झाली. भाजी घेऊन येताना आणि वृंदाशी मास्कमधून गप्पा छाटताना विलंब झाला की पोलीस ओरडू लागले. पार्श्वभागावर छडीचा प्रसाद मिळू लागला. मग हरिदास गप्पा थोडक्मयात आटपू लागला. तरीही विलंब झाला की त्यांच्या घरासमोरचे पोलीस अंगावर धावून येत. पहिल्या दिवशी पोलिसाला पाहिल्यावर हरिदास आधीच कण्हायला लागला. पोलीस जवळ आल्यावर म्हणाला, “आता मारून टाका मला. चौकातल्या इन्स्पेक्टरने किती जोरात मारलंय. अहो मी एक गुन्हा केला. मला दोनदा नका मारू. अंधा कानून पिक्चरमध्ये अमिताभ पण म्हणतो ना एका खुनाबद्दल दोन वेळा शिक्षा देता येत नाही.’’
पोलिसाने त्याला सोडलं. हरिदास रोज तीच युक्ती करू लागला.
मग पोलिसाने त्याची भाजीची पिशवी काढून घेतली आणि त्याला म्हणाला, “परत त्या चौकात जा आणि तिथल्या इन्स्पेक्टरकडून लिहून आण. तुला कुठं आणि किती जोरात मारलं.’’
हरिदासने खाली मान घातली. पोलिसाने त्याला आधी प्रसाद आणि मग भाजीची पिशवी दिली. आता हरिदासने लॉकडाऊनचे नियम प्रामाणिकपणे पाळायला सुरुवात केली. संस्कृतमध्ये चरून मार खाण्यापेक्षा घरात बसून चरू.