संयुक्त सेना प्रमुख बिपीन रावत यांचा चीनला इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख येथील भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्वस्थिती निर्माण व्हावी यासाठी चीनशी भारताची सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र चर्चा असफल ठरल्यास भारतासमोर सेनाबळाचा उपयोग करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असा स्पष्ट इशारा भारताचे संयुक्त सेना प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सोमवारी दिला. सध्याच्या परिस्थितीत तो अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
सध्या लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाद निर्माण झाला आहे. 15 जूनच्या मध्यरात्री लडाख येथील गालवन खोऱयात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष होऊन भारताचे 20 सैनिक धारातीर्थी पडले होते. तर चिनी सैनिकांचीही मोठय़ा प्रमाणात जीवीतहानी झाली होती. चीनने अद्यापही मृत झालेल्या त्याच्या सैनिकांची संख्या घोषित केलेली नाही. तेव्हापासून दोन्ही देशांच्या सेना सीमेवर एकमेकांसमोर उभ्या आहेत. भारताने येथे चीनच्या तोडीस तोड शस्त्रे आणि सैनिक नियुक्त केले आहेत. दुसऱया बाजूला दोन्ही देशांमध्ये सेनाधिकारी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या आहेत. मात्र, चीन आपली सेना मागे घेण्यास अद्याप तयार झालेला नाही. गालवन खोऱयात पूर्वस्थिती निर्माण झाली असली तरी उष्ण झऱयांचा प्रदेश आणि अन्य ठिकाणी तशी परिस्थिती नाही, असे सेनाधिकाऱयांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर रावत यांनी हा इशारा दिला आहे.
केव्हाही संघर्षाची ठिणगी
दोन्ही देशांच्या सेना एकमेकांसमोर उभ्या असल्याने संघर्षाला केव्हाही प्रारंभ होऊ शकतो, अशी स्थिती असल्याचा दावा अनेक माजी सेनाधिकाऱयांनी केला आहे. भारतीय सेनेच्या 50 ते 60 तुकडय़ा सीमेवर नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच मोठय़ा प्रमाणात क्षेपणास्त्रे, चिलखती वाहने आणि तोफाही आणण्यात आल्या आहेत. चीनला एक इंचही पुढे सरकू द्यायचे नाही, अशा निर्धाराने भारताने प्रतिकाराची सर्व तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सीमेवर शांतता असली तरी चीन जोपर्यंत पूर्ण मागे जात नाही, तोपर्यंत तणाव राहण्याची शक्यता आहे, असे मत अनेक सामरिक तज्ञांनी व्यक्त केले.