कोरोनावर विजय मिळवण्यासाठी लस येईल तेव्हा येईल; परंतु तोपर्यंत या विषाणूसंसर्गापासून स्वतःचा बचाव कसा करता येईल, यासाठी सध्या सर्वच जण झटत आहेत आणि वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत.
- अलीकडेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी यासाठी जलनेतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मागील तीन महिन्यांपासून नियमित जलनेती करणार्या 600 हून अधिक डॉक्टर व इतर कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. जलनेतीने कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, असा दावा नाही. मात्र संसर्गाची शक्यता कमी होते’, असे डॉ. केळकर यांनी म्हटले आहे. जलनेतीच्या अभ्यासातून सकारात्मक निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.
- डॉ. केळकर सांगतात की, नाकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जलनेती केली जाते. नाक कोरडे पडले तर संसर्गाची शक्यता अधिक वाढते. जलनेतीमुळे नाकामध्ये सतत ओलावा राहतो. नाक स्वच्छ होऊन विषाणुंचा भार कमी होतो.
- कशी कराल जलनेती?
जलनेती कोणालाही करता येते. यासाठी बाजारात किटलीसारखे छोटे भांडे मिळते. परंतु ते नसल्यास वाटीचा वापर करता येतो. हे भांडे किंवा वाटी कोमट पाण्याने काठोकाठ भरावी. यानंतर मान तिरकी करुन हे पाणी एका नाकपुडीने आत खेचावे आणि दुसर्या नाकपुडीतून ते बाहेर सोडावे. यानंतर नाकातील पाणी शिंकरून काढून टाकावे. सुरुवातीला ही क्रिया करण्यास अवघड जाईल. काहींच्या घशात पाणी जाईल; पण म्हणून घाबरुन जाण्याचे कारण नाही.
- आयुर्वेदामध्ये जलनेतीसाठी घेण्यात आलेल्या कोमट पाण्यात मीठ टाकले जाते; परंतु डॉ. केळकर यांनी साधे कोमट पाणी घेण्याचा सल्ला दिला आहे.