आप नेते व्हेन्झी व्हिएगश यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
चर्चिल आलेमाव यांनी 50 कोटींसाठी बाणावलीकरांचा विश्वास विकला आहे, अशी उपरोधिक टीका आम आदमी पक्षाचे नेते व्हेन्झी व्हिएगश यांनी केली आहे.
या प्रकारामुळे गोव्याचे राजकारण कधी नव्हे एवढे गढूळ बनविले गेले आहे, असे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगितले. ’आप’ने लोककेंद्रीत राजकारणाचा नवीन प्रकार आणून व्यवस्थेत क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश केला असल्याचे ते म्हणाले.
आमदार चर्चिल यांनी जो प्रकार केला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत कुडतरीचे आमदार आलेक्स लॉरेन्स यांनीही गत महिन्यात नवीन पक्षात प्रवेश करून मतदारांचा विश्वास तोडला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत बाणावली आणि कुडतरीतील मतदारांना या नवीन ’डॉन्स’ चा निरोप घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात सध्या दोन प्रकारचे राजकारणी आढळू लागले आहेत. त्यातील पहिल्या प्रकारात निवडणुकीपूर्वी मोठय़ा प्रमाणात पैसे घेऊन अन्य पक्षात प्रवेश करणारे असतात तर दुसऱया प्रकारात निवडणुकीनंतर स्वाभिमान विकून व मतदारांचा विश्वासघात करून नव्या पक्षात प्रवेश करणारे यांचा समावेश होतो, अशी टीका व्हिएगश यांनी केली.
गेल्या निवडणुकीत बाणावलीतील 9373 लोकांनी चर्चिलसाठी राष्ट्रवादीला मतदान केले. परंतु तो कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच या आमदाराने 50 कोटीच्या भरभक्कम रकमेसाठी नवीन पक्षात प्रवेश केला व बाणावलीच्या मतदारांचा विश्वास विकून टाकला. त्यांच्या कन्येनेही तेच केले. त्यांनी घेतलेले 50 कोटी रुपये 9373 मतदारांमध्ये विभागले तर चर्चिल यांनी प्रत्येक मत 53,344 रुपयांना विकले असाच त्याचा अर्थ होतो, असे व्हिएगश म्हणाले.
या सर्व प्रकारातून शहाणे होऊन जनतेने राज्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी यंदा ’आप’ला मतदान करावे. प्रामाणिक कारभार करणाऱया पक्षाला सरकार चालविण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.