उज्ज्वल भारताचे स्वप्न पहायचे असेल तर सर्वप्रथम प्रत्येक भारतीयाने आरोग्याच्या दृष्टीने सजग राहिले पाहिजे. ‘फिटनेस’ ही काळाची गरज बनली असून त्यासाठी ‘फिट इंडिया’ मोहीम हे जनआंदोलन बनले पाहिजे. हे गमक ओळखून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी खेळ आणि फिटनेस यांचे जवळचे नाते असल्याने 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत फिट इंडिया चळवळीचा मागील वषी शुभारंभ केला. या एक वर्षात या चळवळीला उत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिले.
आज त्यामुळे असंख्य नागरिक फिटनेसच्या बाबतीत जागरूक झालेले आपण पाहतो. 24 सप्टेंबर हा फिटनेस डे म्हणून साजरा केला जातो. काळासोबत चालत असताना सामाजिक, आर्थिक विकासाच्या अत्याधुनिक मॉडेलमुळे अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत व त्याचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर झालेला दिसून येतो. वैज्ञानिक युगात माणूस भोगविलासी, आळशी बनत चाललेला आहे. त्यामुळे त्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून डायबिटीस, बीपी, थायरॉईड, मनोरोग, वंध्यत्व अशा अनेक आजारांचे मूळ चुकीच्या जीवनशैलीमध्ये सापडते. यांच्यापासून स्वतःचे रक्षण करायचे असल्यास सर्वांनी व्यायाम, आहार, निद्रा, शारीरिक व मानसिक हालचालींवर लक्ष दिले पाहिजे.
आज कोरोनाच्या संकटात भारतात काय स्थिती आहे हे आपण पाहतोच आहोत. यामध्ये आजही रोगप्रतिकारक शक्तीलाच महत्त्व आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ते यातून बचावले किंवा सहज सुखरूप बाहेर आले. ज्यांचा फिटनेस कमी आहे ते मृत्युमुखी पडले किंवा त्यांच्यामध्ये फुप्फुसाची कार्यक्षमता कमी झाली, शरीरात काहीतरी वैगुण्य राहिले. यापुढेही निरोगी, स्वस्थ आयुष्य जगायचे असेल तर फिटनेस महत्त्वाचाच आहे. कितीही मोठी जागतिक महामारी येऊ दे त्याच्याशी दोन हात करण्यासाठी शरीर व मन निरोगी, तंदुरुस्त पाहिजेच.
देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, महासत्तेत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक भारतीयाचे आरोग्य उत्तम असेल तर कार्यशक्ती वाढणार व पर्यायाने सशक्त भारत अभियान सफल होणार. म्हणूनच या ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ या अभियानाची आवश्यकता ओळखून त्यात प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे.
फिटनेसचे महत्त्व नक्कीच आपल्या पूर्वजांपासून अधोरेखित झालेले आहे. फिटनेस हा आजकाल सगळय़ांच्याच आयुष्यातला परवलीचा शब्द बनला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत आणि लहानांपासून ज्ये÷ांपर्यंत सगळय़ांच्याच आयुष्यात फिटनेसचे महत्त्व वाढले आहे. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या मूळ मंत्राची खरी प्रचिती आता सर्वांना आली आहे, असे म्हणावे लागेल. सुदृढ शरीर असेल तरच आपण जीवनातील चांगल्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. जीवनात जर काही महत्त्वाचे अमूल्य असेल तर ते आहे मानवी शरीर. मात्र माणसाला त्याची किंमत जेव्हा एखादा अवयव बिघडतो व तो कितीही मोल देऊन पूर्ववत होत नाही तेव्हा कळते. म्हणूनच उशीर झाल्यावर शहाणपण येण्यापेक्षा वेळेत प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते. आणि याचे महत्त्व सद्यस्थितीत-कोरोनाच्या संकटात आपण सर्वांनी अनुभवले आहे. त्याचा भारतीय अर्थकारणावरदेखील प्रभाव जाणवत आहे. थोडक्मयात शारीरिक मानसिक, सामाजिक, बौद्धिक, आध्यात्मिक, आर्थिक, कौटुंबिक सगळय़ाच दृष्टिकोनातून फिटनेस हा महत्त्वाचा ठरतो.
‘फिटनेस का डोस आधा घंटा रोज’ या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने दिवसातला अर्धा तास आपल्या स्वतःच्या फिटनेससाठी देणे आवश्यक आहे. यामध्ये व्यायाम, सायकलिंग, चालणे, पोहणे, पळणे, योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम, मेडिटेशन, खेळ प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार अंगीकारावे. ज्यायोगे शरीराबरोबरच मनाचेही पोषण होईल.
आपल्या जीवनात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो षडरसात्मक, ताजा, सुपाच्य असा असावा. ज्यामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहाइडेट्स, मिनरल्स, फॅट यांचे योग्य प्रमाण आपल्या शारीरिक गरजेनुसार असावे. आपला भारतीय आहार प्रत्येक प्रदेशानुसार तेथील भौगोलिक वातावरणानुसार बदलत असतो व तो तेथील लोकांसाठी उपयुक्त ठरतो. त्याचे प्रत्येकाने अनुकरण करावे. थोडक्मयात खाद्यसंस्कृती ही ज्या प्रदेशात आपण राहतो तेथील अवलंबावी. त्यात च्यवनप्राश, मोरावळा, ड्रायप्रुट्स, भाजी-पोळी, भाकरी, वरण, भात, तूप, लिंबू, ताजी फळे यांचा वापर कल्पकतेने करावा. ऋतूप्रमाणे आपला आहार असावा. भाज्या, फळे ही त्या ऋतूतील त्या प्रदेशात पिकणारी असावीत. म्हणजे त्याचा जास्त उपयोग पोषणामध्ये होईल. सकाळची न्याहारी पोटभर, दुपारचे जेवण मध्यम व रात्रीचे जेवण अल्प मात्रेत करावे. गोड पदार्थांचे सेवन जेवणाच्या सुरुवातीला, तुरट रस जेवणाच्या शेवटी घ्यावे. लोणचे, चटण्या, कोशिंबीर, पापड हे तोंडी लावणे किंवा लाल स्त्राव तयार होईल एव्हढय़ापुरतेच मर्यादित असावे.
जेवणापूर्वी व जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. भूक लागल्यावर खावे, तहान लागल्यावर पाणी प्यावे. आहाराची मात्रा आपल्या जाठराग्नीनुसार ठरवावी. शांत, प्रसन्न चित्ताने सकारात्मक विचारसरणीने म्हणजेच देवाचे नामस्मरण करून जेवावे. याचा आपल्या सर्वांगीण विकासावर परिणाम झालेला दिसून येतो. ज्या विचारसरणीने आपण अन्न बनवतो, ग्रहण करतो याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक जडणघडणीवर होतो हे आता शास्त्रीयदृष्टय़ादेखील सिद्ध झालेले आहे. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी प्रत्येकाने पाळल्या तर नक्कीच आहार संकल्पना जपली जाईल व त्याचा सकारात्मक उपयोग फिटनेससाठी होईल.
आहार व व्यायामाबरोबर झोपेलादेखील अतिशय महत्त्व आहे. झोप कमी झाल्यास वजन वाढते. चिडचिड होते. आपल्या आंतरस्त्रावी ग्रंथीवर परिणाम दिसून येतो. कार्यक्षमता घटते. म्हणून वेळेवर झोपणे, लवकर उठणे याला महत्त्व आहे. एकूणच फिटनेस म्हटले की सर्व दृष्टीने विचार करणे, त्याला आत्मसात करणे आवश्यक आहे.
आपण पडद्यावर अनेक सेलिब्रिटीज, यशस्वी उद्योजक, खेळाडू पाहतो जे आपले फिटनेस आयकॉन असतात परंतु त्यामागे त्यांची खूप मेहनत असते. त्यांचा आहार, झोप, व्यायाम त्यांच्या कार्यानुसार प्रकृतीनुसार आवश्यकतेनुसार बदलत असतो. ते आपल्या शरीराबरोबरच मनाचीही मशागत करत असतात. मेडिटेशन, पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे, सकारात्मक विचारसरणी अवलंबणे, चांगल्या गोष्टींचे अनुकरण करणे व म्हणूनच ते आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असतात.
आज जेव्हा आपले देशाचे प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान मोदीजी एखादी चळवळ हाती घेतात तेव्हा ते स्वतः त्याचे अनुकरण करतात. ते स्वतः एक रोल मॉडेल आपल्यासमोर ठेवतात. योग दिनाच्या दिवशी आपण हे सर्वांनी अनुभवले आहे, पाहिले आहे आणि म्हणूनच आज ही चळवळ यशस्वी होताना आपणास दिसत आहे.
चला तर मग सर्व मिळून फिटनेस हा स्वस्थ जीवनशैलीचा मुख्य स्रोत बनवूया. आनंदी, निरोगी दीर्घायुष्यासाठी या फिट इंडिया मुव्हमेंटमध्ये आपला सहभाग नोंदवूया. स्वस्थ शरीराने सर्व कार्ये सिद्ध होतात. भारताचा प्रत्येक नागरिक फिट असेल तरच भारत पुढे जाईल. जीवनात ध्येय असेल तरच जीवन संतुलित बनते असे स्वामी विवेकानंद म्हणत असत आणि म्हणूनच सफलता व स्वास्थ्य एकमेकांशी जोडलेले आहे आपल्याला आपला भारत सर्वोच्च स्तरावर घेऊन जायचा आहे म्हणूनच ‘मी स्वतः, माझा परिवार, माझा समाज, माझे गाव माझे शहर माझा देश’ या फिट इंडिया चळवळीमध्ये कसा सक्रिय राहील याकडे लक्ष देऊया. एकमेकांना प्रेरित करूया. प्रोत्साहन देऊया व सशक्त भारत अभियान अंतर्गत फिट इंडिया चळवळीचा सदस्य बनूया.
डॉ. वैशाली लोढा,
आयुर्वेदाचार्य आणि योगशिक्षिका, पुणे