उद्या रविवार दि. 21 जून. आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानिमित्त…..
परिवार, समाज, राष्ट्र, विश्वाच्या सर्वांगीण विकासामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून योगासनांचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणूनच योगाभ्यास, ध्यान, चर्चासत्र अशा वेगवेगळय़ा कार्यक्रमाद्वारे ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून व योगदेखील आपणास दीर्घायुष्य प्रदान करतो म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मान्य झालेला योग दिन 2015 पासून 193 देशांपैकी 175 देशात उत्साहाने साजरा केला जातो. यावषी आपण सहावा विश्व योग दिवस साजरा करत आहोत.
कोरोनाचे महासंकट संपूर्ण विश्वावर असताना त्याच्याशी लढण्यासाठी योगाचे महत्त्व सर्वाधिक आहे. या वषीची विश्व योग दिनाची थीमदेखील ‘घरीच योग करा -आपल्या परिवार सोबत’ अशीच आहे. भारताने दोन विश्वविक्रम करून ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. एकाच जागेवर आणि दुसरे म्हणजे एकाच वेळी सर्वात जास्त लोकांनी योग करण्याचा विक्रम. योग ही भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी आहे.
युज्यते अनेन इति योग: योग म्हणजे जोडणे. शरीर बुद्धी मनाचे आत्म्याशी जोडले जाणे. शारीरिक, मानसिक विकार घालवण्याचे संजीवनीतुल्य शास्त्र आजही मानवाला जीवनदान देण्यासाठी समर्थ आहे. भौतिक सुखाच्या विळख्यात व्यग्र व त्यामुळे त्रस्त झालेला मनुष्यप्राणी रोग निवारणासाठी अनेक मार्ग शोधत वेडय़ासारखा मृगजळाच्या पाठी धावत आहे. तो आपल्या पूर्वजांचे योग व अध्यात्म विसरला आहे. आज समाजाचे मानसिक धैर्य खचलेले आहे. शारीरिक बळ कमी झाले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रोगाने ग्रासलेली दिसून येते.आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली चुकीच्या दिनचर्या व ऋतुचर्यामुळे शरीरांतर्गत प्रदूषण व बाहेरील प्रदूषणाने मानवाला जीवन नकोसे झाले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने सर्व रोग कष्टप्रद झाले आहेत आणि म्हणूनच सक्षम, सुदृढ, आरोग्यदायी उज्ज्वल भारताचे, विश्वाचे स्वप्न पहायचे असेल तर जनतेचे आरोग्य महत्त्वाचे आहे. म्हणूनच योग दिनाचे औचित्य व त्यायोगे आजन्म आरोग्य संपादन हे मुख्य ध्येय डोळय़ासमोर ठेवून अबालवृद्ध स्त्री-पुरुषांना सोपा असा स्वास्थ प्राप्तीचा मार्ग म्हणजे ‘योगाभ्यास.’
योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठीची एक अद्भूत विद्या आहे, जिला हजारो वर्षांपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषिमुनींनी आविष्कृत केले होते. तसे अनेक दाखले आपल्या वेदात आहेत. महषी पतंजलींनी अष्टांगयोग रूपात ते आपल्या समोर आणले. त्यांना योग दर्शनाचे संस्थापक मानले गेले आहे. पतंजली योगशास्त्रानुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ती आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते. पतंजली ऋषिंनी आपल्या योगशास्त्रात सर्वात प्रथम योग: चित्तवृत्ती निरोध: अशी विस्तृत व तर्कसंगत व्याख्या केली आहे. मनामध्ये तयार होणारी विचारांची आवर्तने म्हणजे वृत्ती. यांचा जीवनावर चांगला वाईट प्रभाव पडत असतो. या वृत्तीवर नियंत्रण आणणे म्हणजे मनावर नियंत्रण आणणे. चित्तवृत्तीवर नियंत्रण करण्यासाठी पतंजलींनी अष्टांगयोग सांगितला आहे. त्याला राजयोगदेखील म्हटले जाते. ते म्हणजे 1. यम- या अंतर्गत सत्य, अहिंसा अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. 2. नियम- शौच, संतोष, प्रसन्नता, तप, स्वाध्याय, ईश्वरप्राणीधान 3. आसन- आपले शरीर निश्चल राहून सुख मिळते. 4. प्राणायाम- मनाच्या शांतीचे साधन. 5. प्रत्याहार- वस्तूंपासून भोगापासून इंद्रियांना परावृत्त करणे. 6. धारणा-चित्ताला बांधून ठेवणे. 7. ध्यान-धारणेच्या विषयावर स्थिर होणे. सृजनात्मक शरीर व मन स्वास्थ्यासाठी ध्यान उपयुक्त. भगवद्गीतेमध्ये योगाचे तीन प्रकार सांगितले आहेत कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग. योग ही जीवनशैली पूर्ण विज्ञान पूर्ण चिकित्सापद्धती अध्यात्मविद्या आहे. तर जाती, प्रांत, लिंग, संप्रदाय कोणीही करू शकते. योग शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, बौद्धिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा सर्वांगीण पातळीवर काम करते.
शारीरिक- अंतस्त्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते, स्नायूंना बळकटी, फुफ्फुसाचे कार्य उत्तम, हृदयाचे रक्ताभिसरण उत्तम होते, लवचिकपणा वाढतो, सर्व अवयवांचा विकास होतो व शरीराची कार्यक्षमता वाढते. मानसिक- मनोधैर्य वाढवते, प्रसंगावधान येते, निर्णय क्षमता चांगली बनते, मन शांत, आनंदी उत्साही बनते. मनावरील ताण तणाव दूर होऊन सजगता येते. कौटुंबिक- शारीरिक व मानसिक स्वास्थ्य असल्याने प्रेम, माया, आपुलकी वाढते. आनंद, उत्साह वाढतो. समाधान, शांत, म्हणून नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करतो. सामाजिक-कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असल्याने सामाजिक जाणिवेतून समाज प्रबोधन व आरोग्य सुधारले जाते. भांडण तंटे मारामारी इ. अनेक गोष्टींना आळा बसून सामाजिक भावनिक शांतता प्रस्थापित होते. बौद्धिक-आकलन शक्ती व स्मरणशक्ती वाढते. सजगता येते. मुलांमध्ये बुद्धीवर्धन दिसून येते. शैक्षणिक-कौशल्याचा विकास होतो. कल्पकता वाढते. खेळांमध्ये प्रगती होते. बल वाढवते. स्थैर्य येते. चारित्र्य घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. आध्यात्मिक-तणाव मुक्त, आनंदी, समाधानी, शरीर व मनाने ईश्वराधीन होते. षड्रिपुंपासून दूर जाते. सद्सद्विवेकबुद्धी प्रगल्भ होते.
ध्यान- सध्या कोरोनाच्या महासंकटात सर्वांचे मानसिक संतुलन थोडय़ाफार प्रमाणात तरी बिघडलेले आहे. सतत उद्दिष्टपूर्तीसाठी धावत असताना या लॉकडाऊनच्या काळात एकदम सर्व थांबल्यामुळे आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ मिळाला आणि तेव्हा खरे ध्यानाचे महत्त्व जाणवले. पान गळती होऊन पुन्हा जसे नवीन पालवी पल्लवीत होते व वृक्ष पान फूल फळांनी बहरून जातो अगदी तसेच ध्यानामुळे षड्रिपुंची गळती होऊन ते नव्याने, नवचैतन्य मिळवून आत्मानंद मिळवते. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱया आरामापेक्षा अधिक असतो. तुमच्या सर्व पेशींचे कार्य सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते. ध्यान तणावाला आपल्या शरीर व मनप्रणालीमध्ये येऊच देत नाही किंवा असलेला ताण बाहेर काढून टाकते. आपल्या रोजच्या चिंता, धावपळ, अयोग्य आहारामुळे वाढलेली रक्तातील लॅक्टिक ऍसिडची मात्रा कमी होते व घाबरणे, चिंता थांबते. मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी जसे डोकेदुखी, त्वचारोग, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी, रक्तदाब नियंत्रणात राहतो. सेरोटोनिन म्हणजे चांगले अंतस्त्राव तयार होतात व त्यामुळे आनंद, उत्साह, चैतन्य वाढते. व्याधीक्षमत्व वाढते. आंतरिक शक्तीचा स्रोत मिळतो. ध्यानामुळे मेंदूलहरी अल्फा स्थितीत येतात. ज्यामुळे रोग निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. मन ताजे, मृदू, सुंदर राहते. भावनिक स्थिरता आणि सुसंवाद वाढतो. सृष्टीशी एकरूप होऊन त्याच्याबद्दलची जाण निर्माण होते व प्रकृती संवर्धनाचा संकल्प आपोआप येतो. आत्मविकास होताना विरक्तता येते. वैयक्तिक परिवर्तन घडून येते. वैश्विक चेतनेचा उदय होतो. कोणत्याही परिस्थितीतून सहज बाहेर पडण्यासाठी किंवा त्या परिस्थितीमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ध्यान अत्यंत फायदेशीर ठरते.
सूर्यनमस्कार- सूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आणि शारीरिक मानसिक व आत्मिक शक्तींचा विकास घडवणारा शास्त्रशुद्ध प्रकार आहे. सामर्थ्य व दीर्घायुष्य संपादन करण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. यालाच सूर्य उपासनादेखील म्हटले जाते. यात दहा वेगवेगळय़ा आसनांचा समावेश होतो. ज्याच्यामुळे रक्त संचालन उत्तम प्रकारे होऊन शरीरातील सर्व मांसपेशी व स्नायू पूर्णता कार्यक्षम बनतात. सूर्य उपासना या शारीरिक तथा आध्यात्मिक तत्त्वाने याचा अभ्यास केल्यास सूर्याच्या किरणांचा अमृततुल्य लाभ मिळतो. रोगप्रतिबंधक शक्ती वाढून रोगनिवारणाची किमया साध्य होते. सूर्यनमस्कार सर्वांसाठी, सर्व धर्मियांसाठी एक वरदान आहे.
प्राणायाम-प्राणायामदेखील योगाचा एक भाग आहे. श्वसनाच्या माध्यमातून आपल्या प्राणावर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे प्राणायाम. प्राणायामाचा उद्देश हा शरीरातील प्राणशक्तीला उत्प्रेरित, नियमित आणि संतुलित करणे हा आहे. जिच्यामुळे आपण जिवंत आहोत अशी वैश्विक जीवनशक्ती म्हणजे प्राण आणि आयाम म्हणजे तिला नियंत्रित करणे. सूक्ष्म स्तरावर याला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या शरीरातील नाडी व चक्र यांच्यामधून प्राण संचारतो. भस्त्रिका, कपालभाती केल्याने त्यांच्यातील अडथळे दूर निघून जातात. अनुलोम-विलोम, भ्रामरी, उज्जैयी, शीतली सित्कारी या प्राणायामानेदेखील उत्साह वाढतो. नवचैतन्य निर्माण होते, सकारात्मक वाटते. प्रत्येक चांगल्या वाईट स्थितीत आपण अगदी स्तंभाप्रमाणे अढळ असतो. प्राणायामाचा मुख्य उद्देश ऊर्जावहन करणाऱया मुख्य स्त्राsतसांना शुद्ध करणे. शरीराचे पोषण करणे. त्यांना चिंतामुक्त करणे, शांती, एकाग्रता वाढवणे व मन निश्चल करणे. चला तर मग, जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग साधनेला अंगीकारूया. आत्मोन्नतीचा मार्ग अवलंबून वैश्विक शांती, सदाचार, उन्नतीसाठी खारीचा वाटा उचलूया.
-डॉ. वैशाली लोढा
आयुर्वेदाचार्य, योग प्रशिक्षक, पुणे