प्रतिनिधी / सांगली
जत तालुक्यातील डफळापूर येथील काँग्रेस नेते व पंचायत समितीचे माजी सभापती सुनील चव्हाण आणि त्यांची पत्नी शैलजा यांच्या दुहेरी खूनप्रकरणी आरोपी परशुराम रामचंद्र हिप्परगी (रा. बेरडहट्टी, ता. अथणी, जिल्हा विजापूर) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले.
जत तालुक्यातील डफळापूरपासून काही अंतरावर असलेल्या चव्हाण यांच्या बंगल्यातील बेडरुममध्ये दि. 19 जानेवारी 2015 रोजी रात्री चव्हाण पतीपत्नीचा खून झाला होता. हा खून त्यांच्याकडे सालगडी म्हणून काम करणारा परशुराम हिप्परगी ( रा. बेरडहट्टी, ता. अथणी, कर्नाटक) यानेच केल्याचे कोर्टात स्पष्ट झाले आहे. आरोपीला दारुचे व्यसन होते. घटनेच्या दिवशीही तो अति दारु पिऊन आल्याने चव्हाण हे त्याच्यावर रागावले होते. ते रागावल्याचा राग मनात ठेवून आरोपीने रात्रीच्यावेळी एका हातात कोयता आणि दुसऱया हातात विळा घेऊन बेडरुमध्ये झोपेत असलेले सुनील चव्हाण यांच्यावर गळ्यावरच वार केले. त्यानंतर त्यांच्या शेजारीच असलेल्या शैलजा यांच्यावरही सपासप वार केले.
चव्हाण पती पत्नीवर आरोपीने तब्बल पंचवीस वार केल्याचे समोर आले आहे. दोघांचे खून केल्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल घेऊन बलोरे या चारचाकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गाडी बंद पडली. त्यानंतर आरोपीने पुन्हा बेडरुमध्ये जावून कपडय़ांनी रक्त पुसून दरवाजा लावून घेतला. रक्ताची कपडे कोंबडय़ाच्या खुराडय़ात टाकले तर कोयता आणि विळा शौचालयाच्या टाकीवर ठेवला. चव्हाण यांची दुचाकी घेऊन तो गावाकडे पळून गेला होता. या गुह्याचा तपास जतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी केला. आरोपीला दि. 21 जानेवारी 2015 रोजी अटक केली.
जिह्याचे प्रमुख न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांच्या न्यायालयात या खटल्यावर सुनावणी झाली. तत्कालीन सरकारी अभियोक्ता अरविंद देशमुख यांनी सरकारची बाजू मांडताना 19 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या होत्या. आरोपीने आपण खुनाच्या घटनेदिवशी चव्हाण वस्तीवर नव्हतो. चार दिवसाची सुट्टी घेऊन गावाकडे गेलो होतो, असा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्याने गुह्याची कबुली ज्या न्यायाधीशांसमोर दिली होती. तेच न्यायाधीश शहाजी साळुंखे यांनी कोर्टात साक्ष देताना वस्तुस्थिती मांडली. तक्रारदार महेश चव्हाण, योगेश व्हनमाने, डॉ अभिजित चोथे व इतर पंचाच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. आरोपीला गेल्या आठवडय़ात भादंविस कलम 302, 452, 379 अन्वये दोषी ठरविण्यात आले होते यावर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. दोन अण्णासो पाटील यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविली.