प्रतिनिधी/ फोंडा
विनोद ही वैश्विक भावना आहे. त्याला भाषेची बंधने नाहीत. मराठी साहित्यात विनोदी वाङमयाची मोठी परंपरा असून या प्रकाराने साहित्य दालन समृद्ध केले आहे. जगण्यासाठी विनोदाची आवश्यकता नाही, पण चांगले जगण्यासाठी विनोद गरजेचा आहे, असे प्रतिपादन ऍड. विलास कुवळेकर यांनी केले.
केरी-फोंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण मराठी परिषदेच्या 15 व्या शेकोटी संमेलनात ‘जगण्यासाठी विनोदाची गरज आहे का?’ हा परिसंवाद विविधांगानी चर्चात्मक ठरला. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, अंजली आमोणकर, विनोद गायकवाड व अनंत काजरेकर या वक्त्यांचा त्यात सहभाग होता. विनोद हा निर्विष असावा, असेही ऍड. कुवळेकर यांनी नमूद केले. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी मराठीतील विनोदी साहित्यापासून जागतिक विनोदी कलाविश्वाचे संदर्भ देताना विनोद हा केवळ भाषेपुरताच मर्यादित नसल्याचे सांगितले. अन्यथा चार्ली चापलीसारखे अबोल चित्रपट अजरामर ठरले नसते. विनोदाची व्याप्ती भाषेच्या पलिकडे आहे. मराठी विनोदी साहित्याचा संदर्भ देताना पु. ल. देशपांडे व आचार्य अत्रे यांनी मराठी साहित्याला विनोदाचा वेगळा दृष्टीकोन दिल्याचे त्यांनी नमूद केले. वाचकांना खळखळून हसविण्याची हातोटी त्यांच्या विनोदी लेखनात होती. विनोदामुळे जीवनातील विविध प्रश्नांची गांभीर्य सौम्य होण्यास मदत होते. हेच त्याचे खरे सामर्थ्य आहे. ती एक वैश्विक भावना आहे, असेही कृष्णाजी कुलकर्णी यांनी सांगितले.
विनोद गायकवाड यांनी विनोद हे पृथ्वीवरील अमृत असल्याचा उल्लेख करून केवळ हसण्यासाठीच नव्हे तर उत्तम आरोग्यासाठीही त्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आज समाजात विविध प्रश्नांमुळे तणाव प्रचंड वाढलेला आहे. विद्यार्थ्यांपासून शेतकऱयांपर्यंत आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. समाजातील या वाढत्या मानसिक तणावावर विनोदामुळे काही प्रमाणात मात्रा सापडते. यासंबंधी त्यांनी काही उदाहरणेही सांगितली. अंजली आमोणकर व अनंत काजरेकर यांनी विनोद जीवनात आवश्यक असल्याचे सांगून विनोदामुळे बुद्धीला खाद्य व आनंदप्राप्ती होते, असेही त्यांनी नमूद केले.
आजचा विद्यार्थी ज्ञानवंत नव्हे ‘गुण’वंत..!
‘आजचा युवक आव्हानापासून दूर पळतोय का?’ हे चर्चासत्र प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. आजच्या युवा पिढीसमोरील व एकंदरीत व्यवस्थेविषयी त्यात विचार मंथन झाले. आजच्या युवकांना माहिती व ज्ञान विविध माध्यमातून मिळत असते. त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची असे प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी सांगितले. आजच्या शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयात दाखल होणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याची सोय या व्यवस्थेत आहे. त्यामुळे अपयश आल्यास ही उणिव शिक्षकांच्या माथी मारली जाते. आजचा विद्यार्थी प्रशस्तीपत्र घेऊन शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडणार हे खरे असले तरी, त्याला ज्ञान मिळणारच याची खात्री देता येणार नाही, असे परखड मतही त्यांनी मांडले.
स्नेहा देसाई यांनी संस्काराअभावी आजची युवा पिढी भरकटत चालल्याचे सांगितले. प्रा. सुभाष जाण यांनी आजच्या तरुणांना दिशा दाखवण्याची गरज व्यक्त करून चांगल्या वाईटाची समज त्यांना मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले. आजचा युवक विचार न करता कृती करीत असल्याचे राघोबा पेडणेकर यांनी सांगितले. सीमा क्षीरसागर यांनी आजच्या युवापिढीला योग्य मार्गदर्शनाबरोबरच संस्काराची गरज असल्याचे सांगून मनावर ताबा ठेवल्यास ते आत्मविश्वासाने वावरु शकतील असे त्या म्हणाल्या.