चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन सुरु
जमिन वाटप, संकलन दुरुस्तीसह विविध प्रश्न प्रलंबित
प्रतिनिधी / कोल्हापूर
चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेश देऊनही त्याची पुर्तता झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलातर्फे चांदोली व वारणा प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
दुपारी एक वाजता राज्य कार्यकारी अध्यक्ष संपत देसाई व जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोजक्या प्रकल्पग्रस्तांसमवेत आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग व सॅनिटायझर या त्रिसुत्रीचे पालन करत या आंदोलनात सहभाग घेतला. इतरवेळी होणार्या आंदोलनात मोठÎा संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी होत असल्याचे चित्र आहे. परंतु यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांची संख्या कमी केल्याचे दिसून आले.
संपत देसाई व मारुती पाटील म्हणाले, आंदोलन केल्याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह जमिन वाटप, संकलन दुरुस्ती असे विविध प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील मागण्या अशा, 215 हेक्टर निर्वणीकरणाची जमिन मोजणी करुन वाटपासाठी उपलब्ध करणे, शिरोळ तालुक्यातील गायरान जमिन 110 हेक्टर, हातकणंगले तालुक्यातील 150 हेक्टर जमिन, शेती महामंडळाची जमिन, पारगाव (ता. हातकणंगले) येतील शेरी व वन खात्याची जमिन वाटपास उपलब्ध करणे, चांदोली व वारणा प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनीस समन्यायी पध्दतीने पाणी वाटप करणे, मूळ गावातील जमिनी संपादन न होता परस्पर वनविभागाकडे वर्ग झालेल्या जमिनी संपादन करणे, चांदोली अभयारण्यातील तनाळी, निवळे, ढाकाळे, चांदेल, सोनार्लीपैकी धनगरवाडा, कुल्याचीवाडी व रत्नागिरी जिह्यातील गोठणे गावचे संकलन दुरुस्ती करुन अद्ययावत करणे, वारणा प्रकल्पग्रस्तांच्या मूळ गावातील ताली व चुकलेली घरे यांची मोजणी करुन मोबदला देणे, लाटवडे, दुर्गेवाडी, कुंभोज या वसाहतीमधील लोकांनी पंसतीनुसार भुखंडाचे व जमिनीचे आदेश काढून उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना 100 टक्के जमिनीचे व भूखंडाचे वाटप करणे.
आंदोलनात राजाराम पाटील, डी. के. बोडके, शंकर पाटील, नजीर चौगले, वसंत पाटील, प्रकाश बेलवलकर, पांडुरंग कोठारी, पांडुरंग पोवार, जगन्नाथ कुडतुरकर, शामराव कोठारी, लक्ष्मण सुतार, भगवान बोडके, बिनोद बडदे, शफिक सय्यद, राजू लाखन आदी सहभागी झाले होते.