गणेशोत्सव पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याची गरज : उशीर झाल्यास क्वारंटाईन नियम उल्लंघनाची शक्यता
प्रतिनिधी / कणकवली:
गणेशोत्सवाला उणापूरा दिड महिना शिल्लक असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखभराहून अधिक चाकरमानी जिल्हय़ात आले आहेत. तरीही आणखी काही चाकरमानी गणेशोत्सवाला जिल्हय़ात येणार आहेत. मुंबई, पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी चाकरमानी जिल्हय़ात येण्याबाबतचे धोरण निश्चित व्हायला हवे. सध्याच्या नियमानुसार 14 दिवसांचे क्वारंटाईन करायचे असल्यास गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांना किमान 14 दिवस अगोदर यावे लागेल. चाकरमानी आल्यानंतर होम, रुम क्वारंटाईन करण्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्यवेळी निर्णय जाहीर करण्याची गरज आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे सव्वा लाखाहून अधिक चाकरमानी जिल्हय़ात दाखल आहेत. अद्याप काही चाकरमानी यायचे शिल्लक असून ते गणेशोत्सवासाठी येण्याची शक्यता आहे. त्यातच पुणे, मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता, चाकरमानी जिल्हय़ात येणार हे निश्चित आहे. मात्र, हे चाकरमानी गणेशोत्सवापूर्वी काही दिवस अगोदर म्हणजे चार-आठ दिवस, एक-दोन दिवस येण्याची शक्यता आहे. परंतु, मुंबई, पुण्याहून आल्यानंतर त्याला 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. ऐन गणेशोत्सवात हे शक्य आहे का? याबाबतही विचार करण्याची गरज आहे.
सिंधुदुर्गचा विचार केला, तर जोपर्यंत येणाऱया चाकरमान्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जात होते, तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिकांपर्यंत पोहोचला नव्हता. मात्र, नंतरच्या टप्प्यात होम क्वारंटाईन सुरू झाले आणि स्थानिक व्यक्तींपर्यंत कोरोना पोहोचला ते नियमांचे पालन न झाल्याने हे सिद्ध होते. अशा परिस्थितीत पुढील काळात ही साखळी ब्रेक झाल्यानंतर पुन्हा स्थानिक पातळीवर प्रादुर्भाव जाणवू नये, यासाठी दक्षता घेण्याकरिता चाकरमान्यांना जिल्हय़ात येण्याबाबतचे निकष निर्धारित करण्याची गरज आहे. गणेशोत्सवापूर्वी त्यांनी किती दिवस यावे? क्वारंटाईनचा भंग झाल्यास कडक कारवाई व त्या अनुषंगिक धोरण प्रशासकीय पातळीवर निश्चित करण्याची गरज असल्याचे दिसत आहे.