प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचे संकट सर्वत्र व्यापलेले असताना कोणत्याही कारणास्तव गणेशोत्सवात खंड पडता कामा नये, प्रथा, परंपरा जपल्या पाहिजेत. कोरोना यंदा आहे…पुढील वर्षी नसेल…शिवाय, अशा कठिण प्रसंगी एकमेकाला साथ देणे हा मानव धर्म रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये-हातीस येथील ग्रामस्थांनी पाळला. कोरोनामुळे गावी न आलेल्या एकूण आठ मुंबईकर चाकरमान्यांच्या घरात ग्राम कृती दलाच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व कौतुक होत आहे.
टेंभ्ये-हातीस या गावातील मुंबईकर चाकरमान्यांना गावी न गेल्यास गणपती आणणार का गणेशोत्सव साजरा करणार कसा? असे प्रश्न पडले होते. पण, चाकरमान्यांची हीच समस्या ओळखत रत्नागिरी जिह्यातील टेभ्ये गावानं घेतलेला पुढाकार सर्वांसाठी आदर्श ठरला. कारण, ’ज्या चाकरमान्यांना गावी येत गणेशोत्सव साजरा करणं शक्य नाही, त्यांनी काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही. तुमच्या घरी बाप्पा विराजमान होईल ही जबाबदारी आमची!’ अशी भूमिका या गावानं घेतल्यानं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला होता शिवाय, गावामधील मधील एकीचे देखील दर्शन झाले.
क्वॉरंटाईनचे नियम पाळत सर्वच चाकरमान्यांना गणेशोत्सव साजरा करणं शक्य नाही. त्यामुळे गावच्या सभेत यावर चर्चा झाली. सर्वांनी ज्या चाकरमान्यांना येणे शक्य नाही. त्यांच्या घरी बाप्पा कशारितीनं विराजमान होईल याचा विचारविनिमय केला. यावेळी शेजारच्या काही लोकांनी गणपती आणण्याची जबाबदारी घेतली. याबाबत चाकरमान्यांना कळवले गेले. त्यांनी देखील या साऱया प्रस्तावाला हसतमुखानं संमती दिली. शिवाय, यावेळी होणार खर्च संबंधित व्यक्तिच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय झाल्याचे टेंभ्ये – हातिस ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन नागवेकर यांनी सांगितले.
चाकरमान्यांना गावी येणे शक्य होते, ते सारे नियम पाळत गावी आले. त्यामुळे गावात कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. दीड दीवस, पाच दिवस किंवा अगदी सात दिवस देखील चाकरमान्यांच्या बाप्पाची सेवा करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला. त्यानुसार हा उत्सव पार पाडला जात असल्याचे नागवेकर यांनी सांगितले. गावानं घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.