सिंधुदुर्गची विलगीकरण क्षमता संपली तब्बल 12 हजार 800 चाकरमानी दाखल पूर्वसंमतीविना पास नको, राज्यातील जिल्हाधिकारी, पोलीस उपायुक्तांना पत्र
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येमुळे रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानेही हतबलता व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत 12 हजार 800 चाकरमानी दाखल झाल्याने विलगीकरणाची क्षमता संपल्याचे स्पष्ट करत ‘रेड झोन’मधून येणाऱयांचा ओघ असाच राहिल्यास जिल्हय़ात ‘कोरोना’ रोखणे अवघड होणार आहे. त्यामुळे ‘रेड झोन’मधून नागरिक येत असलेल्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांच्या पूर्वसंमत्तीविना पास देऊ नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ‘रेड झोन’मध्ये येणाऱया राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्तांना पाठविले आहे.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली. सिंधुदुर्गात त्याची कडक अंमलबजावणी झाली. त्यामुळे जिह्यात मुंबई प्रवास करून आलेला ‘कोरोना’बाधित रुग्ण वगळता महिनाभर एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनच्या उंबरठय़ावर होता. परंतु तिसऱया लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल केल्यामुळे कोकणात येणाऱया चाकरमानी मंडळींची संख्या वाढली. रत्नागिरी जिह्यात तर कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती हाताबाहेर गेली, हे खुद्द जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कबूल करत हतबलता व्यक्त केली. रत्नागिरी जिह्यात 86 पेक्षाही अधिक ‘कोरोना’बाधित रुग्णसंख्या आहे. जिह्याबाहेरून येणाऱया लोकांना विलगीकरण कक्षात ठेवायला जागा नाही. त्यामुळे लोकांना घरीच पाठविले जात आहे. आता सिंधुदुर्गातही हीच परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने आतापासूनच हतबलता व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सद्यस्थितीत ‘कोरोना’चा मोठा प्रादुर्भाव नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु चाकरमान्यांची वाढती संख्या पाहता जिह्याची परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते. सध्या ‘कोरोना’ नमुने तपासणी कमी आहे. ती वाढविल्यास खरे चित्र स्पष्ट होऊ शकते. त्यामुळेच संभाव्य धोका ओळखून जिल्हाधिकारी सतर्क झाल्या असून जिह्याबाहेरून येणाऱयांना ब्रेक लावण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.
क्षमता संपल्याने प्रशासनासमोर अडचण
तिसऱया लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल झाल्याने त्याचाच फायदा घेत चाकरमान्यांनी ई पास मिळवत जिह्यात यायला सुरुवात केली आहे. आपल्या जिह्यातील लोक कमी करण्यासाठी तेथील जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्तांनी पास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे जिह्यात अवघ्या चार-पाच दिवसात 12 हजार 800 लोक दाखल झाले आहेत. जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय विश्राम गृह, धर्मशाळा, भक्तनिवास येथे लोकांना विलगीकरण करून ठेवले जात होते. पण आता बऱयाचशा जागा भरल्याने गावातील शाळांमध्ये विलगीकरण केले जात आहे.
ग्रामसमित्यांवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, भरवस्तीत शाळा असल्याने ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. त्यामुळे वादाचे प्रसंगही निर्माण झाले. परंतु शाळेत नागरिकांना ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. आता 12 हजार 800 लोक जिह्याबाहेरून दाखल झाल्यानंतर शाळांचीही विलगीकरणाची क्षमता संपली आहे. चाकरमानी येत राहिल्यास त्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर आहे.
आरोग्य सुविधांचा अभाव
जिह्यात विलगीकरण कक्षाची क्षमता संपली तर आहेच. त्याशिवाय जिह्यात पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी आजही कोल्हापूर किंवा गोव्याला न्यावे लागते. ही परिस्थिती पाहता जिह्यात येणाऱया लोकांची संख्या वाढत गेल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अवघड होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.
ई पास थांबविण्याची विनंती
या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिह्याची परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी जिल्हाधिकाऱयांनी ठोस पाऊल उचलत मुंबई शहर, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर या शहरांचे पोलीस उपायुक्त तसेच ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर या रेड झोनमध्ये येणाऱया ठिकाणचे जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्त यांना पत्र पाठविले आहे. अत्यंत तातडीचे वैद्यकीय व अत्यावश्यक प्रयोजन वगळता कुणालाही पास देऊ नयेत. तसेच रेड झोन व अन्य ठिकाणाहून येणाऱया नागरिकांच्या बाबतीत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांच्या पूर्वपरवानगीशिवाय पास देऊ नयेत, असे पत्र जिल्हाधिकाऱयांनी पाठविले आहे. त्यामुळे आगामी काळात चाकरमान्यांचे आगमन थांबते का, याकडे लक्ष लागले आहे.