सावंतवाडीत सरपंच बैठकीत निर्णय : आरती, भजनावर निर्बंध : 7 ऑगस्टपर्यंतच गावी यावे, नियम मोडल्यास गुन्हा!
वार्ताहर / सावंतवाडी:
चाकरमान्यांना आपल्या गावी गौरी गणपतीसाठी यायचे असेल तर 7 ऑगस्टपूर्वी ई पासवरच यावे. त्यांना 14 दिवस गावात संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. वाडय़ावाडय़ातील भजन मंडळांना आरती, भजन करता येणार नाही. क्वारंटाईनसाठी गावातील शाळा पुन्हा चतुर्थी कालावधीत ताब्यात घेतल्या जाणार आहेत. कंटेनमेंट झोन फक्त त्या घरापुरताच ठेवावा, असे नियोजन सावंतवाडी तालुका सरपंच बैठकीत करण्यात आले. क्वारंटाईन असणाऱयांनी नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई अथवा फौजदारी गुन्हा आरोग्यसेवक, ग्रामसेवक यांनी दाखल करावा, असे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिले.
सावंतवाडी तहसील कार्यालयात तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार म्हात्रे, प्रभारी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, ग्रामपंचायत विभागाचे आरोसकर, प्रशांत चव्हाण, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद गावडे, दिनेश सावंत, संजय कानसे, खेमराज भाईप, शरद नाईक, मदन सातोसकर, सुरेश राऊळ, बाळू शिरसाट, रेखा घावरे, अभिलाष देसाई, बाळू वाळके, स्नेहा मिठबावकर, अपर्णा तळवणेकर, स्मिता मोरजकर, संजना सावंत, गुंजन हिराप, प्रमिला गावडे, शीतल जोशी, अक्षरा पाडलोसकर, सजला केरकर, अक्षता आरोंदेकर, ऋचिता सावंत, साक्षी तोसरकर, भिकाजी केणी, विजय वालावलकर, संदीप आंगचेकर, देवेंद्र सावंत, अंकुश कदम, जयेश सावंत, केशव जाधव, भरत पेडणेकर, डॉ. मनस्वी राऊळ, सुप्रिया मडगावकर, उमा बुगडे, विनायक सावंत, अजित नातू, रावजी दळवी, लक्ष्मण गवस, निधी नाईक, उत्कर्षा गावकर, रोशनी पारधी, वैदेही देसाई, स्नेहल असणकर, रेश्मा गावकर, विश्राम सावंत, पूजा पेडणेकर, गोविंद केरकर, वर्षा वरक, सुमन कवठणकर, दीनानाथ कशाळीकर आदी सरपंच उपस्थित होते.
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. मूर्ती लहान असावी. भजने, आरती करू नये. सत्यनारायण महापूजा साधेपणाने घरात करावी. विसर्जन मिरवणूक वाजतगाजत नको. पुरोहित बाहेरील जिल्हय़ातून आल्यास 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
चाकरमान्यांचे क्वारंटाईन
मुंबई, पुणे, गोवा आदी भागातून येणाऱयांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. यासाठी गावातील प्राथमिक शाळा घेतल्या जातील. ज्यांच्या घरी सोय असेल त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. यासाठी शाळा मुख्याध्यापक, पोलीस पाटील, तलाठी यांची बैठक घेऊन नियोजन केले जाईल. गत क्वारंटाईनवेळी तलाठय़ांचा सहभाग कमी होता. यावेळी त्यांना सहभागी केले जाईल, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
क्वारंटाईन व्यक्तीचे हमीपत्र घेतले जाईल. त्यानुसार त्यांनी बाहेर पडल्यास, नियम तोडल्यास आरोग्यसेवक गुन्हा नोंदवतील. ई पाससाठी दाखला आवश्यक आहे. कंटेनमेंट झोन फक्त त्या घरापुरता मर्यादित ठेवला जाईल, असे स्पष्ट केले.
सरपंच प्रमोद गावडे, संदीप आंगचेकर, संजय कानसे, डॉ. मनस्वी राऊळ, खेमराज भाईप, सुप्रिया मडगावकर यांनी क्वारंटाईनसाठी कालावधी 14 दिवस ठेवावा. यासंदर्भात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, असे सांगितले. तसेच म्हात्रे व नाईक, शिक्षक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक यांनी चांगले काम केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
सरपंचांना प्रशासक नेमा
ज्या अकरा ग्रामपचायतींचा कालावधी ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे, त्या
ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाणार आहे. त्यामुळे शासनाने सरपंचांनाच
प्रशासक नेमावे, अशी मागणी प्रमोद गावडे यांनी केली. म्हाळवस कालावधीतही नियम करावे, असे शरद नाईक यांनी सूचित केले. साध्या पद्धतीने म्हाळवस करण्याचे ठरले.