कोंडीवळे ग्रामस्थांनी पाठवली चाकरमान्यांसाठी तांदूळ आणि डाळ
वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यातील ओणी कोंडीवळे गावातील ग्रामस्थांनी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अडकलेल्या आपल्या गावातील चाकरमन्यांकरीता 2 टन तांदूळ व 1 टन डाळ गावातील घराघरातून जमवून त्याची पाकिटे तयार करुन मुंबईकर चाकरमान्यांना पाठवली आहेत. आजवर मुंबईकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर कोकणातल्या चुली पेटत होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या चाकरमाण्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आता गावकरी सोडवू लागले आहेत.
ओणी कोंडीवळे गावातील बहुसंख्य कुटुंब ही मुंबईस्थित आहेत. कोरोना या साथरोगामुळे देशभरात लॉकडाऊन असताना त्यांच्या घरात शिधेचा प्रश्न निर्माण होवून मुलाबाळांची उपासमार होवू नये यासाठी ग्रामस्थांनी आठ दिवसांपुर्वी गावातील प्रमुख मंडळींनी पुढाकार घेवून गावातील मुंबईत राहणाऱया लोकांची यादी तयार केली व त्यांना प्रत्येकी 5 किलो धान्य मुंबईतील घरात घरपोहोच करण्याचा विचार झाला व तो प्रत्यक्षात उतरवून ग्रामस्थांनी एकत्र येवून शिधा गोळा करीत 5 किलोची पाकीटे तयार पेली. मात्र वाहन परवानगीचा प्रश्न आल्यावर राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या ग्रामपंचायत भेटी दरम्यान अडचण कळविण्यात आली. आ.साळवी यांनी थेट जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचसोबत चर्चा करून तोही प्रश्न मिटवल्याने धान्यासह गाडया मुंबईत रवाना झाल्या.
या उपक्रमात ओणी कोंडिवळे गावविकास ग्रामस्थ मंडळ, गावप्रमुख प्रकाश लिंगायत, अनंत गुरव, पुनाजी लोळगे, विठ्ठल गोरूले, गावातील मानकरी व ग्रामस्थ मंडळ, श्रीदेव विमलेश्वर उत्कर्ष मंडळ ओणी कोंडीवळे व अनंत गोरुले, दिलीप दिवाडे, गोपाळ करंडे, विनायक ठुकरुल, विजय दैत, सुर्यकांत लोळगे, रमेश जानस्कर, सुभाष शिंदे, विलास पळसमकर व अशोक लिंगायत सहभागी होते. आमदार साळवी यांनी वाहन परवानगीचा प्रश्न निकाली काढल्याने ओणी-कोंडीवळे ग्रामविकास मंडळ यांनी त्यांचे आभार मानले.