वार्ताहर/ संगमेश्वर
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चाकरमानी गावाकडे येत आहेत. मात्र चाकरमान्यांना गावी घेण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध होत आहे. तर काही गावातून चांगले नियोजन करुन चाकरमान्यांना दिलासा दिला जात आहे. मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांसाठी माभळे काष्टेवाडीतील संतोष बाळ काष्टे यांने स्वतःची राहती घरे खाली करुन राहण्यासाठी दिली आहेत.
मुंबई,पूणे आणि इतर शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चाकरमानी गावात येत आहेत. गावात येणाऱया चाकरमान्यांमुळे भितीचे वातावरण आहे. मात्र अनेक गावातून त्यांना चांगले नियोजन करुन गावात राहण्याची सोय करण्यात आली आहे. माभळे गावातही मुंबई आणि पूणेतून मोठया प्रमाणात चाकरमानी आले आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांना राहण्यासाठी चांगले नियोजन केले आहे. चाकरमान्यांच्या मदतीसाठी माभळे काष्टेवाडीतील संताष काष्टे यांने सर्व सोयीसुविधेने सज्ज असलेले घर दिले आहे. माभळे काष्टेवाडीतील सभेच्या वेळी त्यांनी आपण चाकरमान्यांच्या सोयीसाठी सज्ज असून माझे राहते घर येणाऱया चाकरमान्यांसाठी देत आहे. तसेच त्यांने आपल्या बहिणीचे घरही रिकामी करुन खाली करुन दिले आहे. ही दोन्ही घरे सोयी आणि सुविधानी सज्ज असून 6 जणांना दोन घरामध्ये राहण्याची सोय केलेली आहे. तसेच वाडीने गावाकडे येणाऱया चाकरमान्यांच्या अत्यावश्यक सेवा पुरविण्याचा भार उचलला असून सर्व वस्तू त्यांना घरपोच दिल्या आहेत.
मुंबईकडे गेलेला चाकरमानी हा नोकरी करण्यासाठी गेलेला असतो. गावातील अनेक कार्यक्रमांत त्यांचाकडून आर्थिक हातभार लागलेला असतो. तो आता संकटात आहे त्याला हातभाराची गरज आहे. त्याची आता आपण काळजी घेतली पाहिजे या भावनेतून आपण ही घरे मुंबईतून व बाहेरुन येणाऱयांसाठी दिली आहेत असे तरुण भारतशी बोलताना संतोष काष्टे यांने सांगितले. यासाठी त्यांने आपल्या पत्नीचा आणि मुलांचाही हातभार लागला असल्याचे सांगितले.