ग्रामपंचायतीच्याबैठकीतमंत्रीउदयसामंतयांचेस्पष्टीकरण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ग्रामीण भागात येणाऱया चाकरमान्यांना 10 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय अंतिम आहे. यासाठी ग्रामपंचायतीला वेगळे निर्णय करता येणार नाहीत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. काही ग्रामपंचायतीनी 14 दिवसांचे ठराव घेतले, त्या बाबत संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यांमधील सरपंचांच्या नुकत्याच घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यंदाचा गणेशोत्सव कोरोना काळात होत आहे. या पार्श्वभूमीवर गावाकडे येणाऱया चाकरमान्यांना चांगले वागवणे आवश्यक आहे. त्या बाबत ग्रामपंचायतींनी सकारात्मक भूमिका ठेवावी तसेच कोरोनाचा फैलाव होणार नाही. याचीही खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप तसेच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाविरुध्द आघाडीवर येऊन काम करणाऱया आरोग्यसेवक तसेच इतरांना शासनाने 50 लाखांचा विमा संरक्षण दिले आहे. यात जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीसह संरपंचांनाही हे सरंक्षण असणार आहे, असे सामंत म्हणाले.
प्रशासक नियुक्तीबाबत न्यायालयाच्या निवाडय़ानंतर निर्णय
जिल्हय़ात 122 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नियुक्त करायचे आहेत. या बाबत न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर निर्णय होईल, असे सांगून सामंत म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी गावात ग्रामकृती दल आहेत. या दलात सर्वांनी सहकार्यासाठी समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱया गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याच प्रकारच्या सूचना गणेश स्थापना व विसर्जन तसेच गौरीच्या सणासाठी दिल्या जाणार आहेत. सर्वांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गावांमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन आरत्या करण्याची पध्दत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करता येणार नाही. यामुळे कोरोना फैलावचा धोका आहे, असे त्यांनी यावेळी मार्गदर्शनात सांगितले. जिल्हय़ात कोरोना झालेल्या रुग्णांचे प्रमाण आयसीएमआरच्या निर्देशांपेक्षा कमी आहे, ही जमेची बाब आहे. बरे होणाऱयांचे प्रमाणही 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यात गणेशोत्सव काळात वाढ होणार नाही, या दृष्टिने प्रयत्न करा, असे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी दिले.
कोरोनाच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा मंत्रीr उदय सामंत यांनी एका बैठकीत घेतला. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप तसेच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा रुग्णालयात सहकार्य न करणारे काहीजण आहेत. अशांवर तातडीने कारवाईचे संकेत त्यांनी या बैठकीत दिले.
जिल्हय़ात 20 हजारांपेक्षा अधिक चाचण्या
जिल्हय़ात 20 हजारांपेक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत. सर्वात गतीमान पध्दतीने कमीत-कमी वेळात चाचण्या झाल्या आहेत, असे सामंत म्हणाले. आयसी एमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तपासणीच्या 10 टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात तर मृत्यूचे प्रमाण 3.5 टक्के असू शकते, असे आयसीएमआर म्हणते. रत्नागिरीत हे प्रमाण 3.4 टक्के आहे, असेही ते म्हणाले. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येतात. सध्या मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी या आधीच जिल्हय़ात दाखल झाले आहेत. त्यामुळे येणारा प्रत्येकजण पॉझिटिव्हच आहे, ही धारणा नागरिकांनी मनातून काढून टाकली पाहिजे. मात्र येणाऱया चाकरमान्यांची योग्य ती तपासणीही केली पाहिजे, असे ते म्हणाले.