मुंबईतून चाकरमान्यांची आवक सुरू झाली तसतसे रुग्ण वाढत गेले आणि शून्य रुग्णसंख्या असलेला रत्नागिरी जिल्हा पाहता पाहता दीड शतक ओलांडून पुढे गेला. सिंधुदुर्ग जिह्यातही चाकरमान्यांमुळे आतापर्यंत 17 जण बाधित झाले आहेत.
कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रारंभी शहरे भीतीच्या छायेखाली होती. सद्यस्थितीत वाढत्या रुग्णसंख्येमुळे गावेच्या गावे ‘लॉक’ होत आहेत. प्रारंभीचा दीड महिना चांगला एन्जॉय केल्यानंतर ग्रामीण भागही काहीसा भीतीने गारठून गेला आहे. काही गावात चाकरमान्यांची बडदास्त, तर काही गावात त्यांची गोठय़ात रवानगी होत आहे. काही कुटुंबात चाकरमान्यांमुळे शेतीच्या पूर्व मशागतीत रंगत तर दुसरीकडे वाद होऊन डोकी फुटत आहेत,
कोरोनाच्या महामारीत मुंबईमध्ये अडकलेला कोकणी माणूस गावाला येऊ पाहत आहे आणि गावातील माणूस यासाठी आक्षेप घेत आहे. या भांडणांमुळे सर्वांची मने दुखावली जात आहेत हे मात्र नक्की. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रारंभी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई परिसरातच जास्त झाला. मात्र कोरोना आला आणि लोकांचा रोजगार गेला, सर्व काही ठप्प झाले. त्यामुळे पोटापाण्यासाठी मोठय़ा शहरांचा रस्ता धरलेल्या नागरिकांना या संकटकाळात पुन्हा गावाकडे येणे रास्त होते, पण या आजाराने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी परतीच्या वाटेवर असलेल्या आपल्याच बांधवांसाठीचे मार्ग बंद केले. गावातील मुख्य रस्त्याला खड्डा, वाटेत काटे, बांबू टाकून वाट अडवली गेली. पहिल्या तीन लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांना गावाकडे येण्यास रोखण्यात स्थानिक यशस्वी झाला होता. शासकीय नियमांचीही त्याला साथ मिळाली. परवानगीच मिळत नसल्याने चाकरमानी शहरातच अडकून पडले होते. शहर परिसरात कोरोना रुग्ण सापडत असताना लॉकडाऊनचा कोणताही परिणाम ग्रामीण जीवनावर होताना दिसत नव्हता. शहरात जे मिळत नव्हते तेदेखील ग्रामीण भागात मिळत होते. सीमेबाहेर जात येत नसल्याने पावसाळय़ापूर्वीची कामे अगोदरच उरकण्यात आली.
चाकरमानी आले, रुग्ण वाढले अन्….
कोरोनाच्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये शासनाने काहीशी शिथिलता दिल्यानंतर मुंबई, पुणेकर चाकरमान्यांची गावाला येण्यासाठी रांग लागली. जिल्हय़ात लाखभर चाकरमानी मिळेल त्या वाहनाने, चालत गावात दाखल होऊ लागले. चाकरमान्यांपाठोपाठ कोरोनाही जिह्यात प्रवेशकर्ता झाला अन् दोन महिने बिनधास्त असलेला गावकरी जागीच हबकला, घराबाहेर पडेनासा झाला. प्रारंभी चाकरान्यांना विरोध करणारा गावकरी मुंबई, पुणेतून येणाऱया लोंढय़ासमोर हतबल झाला. त्यातच प्रत्येकाच्या घरीच चाकरमानी येऊ लागल्याने विरोधाची धारही कमी कमी होत गेली. त्यामुळे आलेल्या चाकरमान्याला स्वीकारून शेवटी स्थानिक स्वत:ही त्याच्याबरोबरच क्वारंटाईन झाला आणि बघता बघता गाव स्वत:हून लॉकडाऊन झाला.
गोठय़ात गुरांऐवजी चाकरमानी
मुंबई, पुणेत लहानग्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्या की चाकरमान्यांना वेध लागतात ते गावाकडे जायचे. मग त्यासाठीची खरेदी आणि घरी नेण्यासाठीच्या वस्तूंचे गाठोडे बांधण्याची तयारी सुरू होते. गावात उतरताक्षणीच स्टेशनवर गावची रिक्षा अथवा वाहने स्वागताला हजर असायची. घरी गेल्यानंतर उंबरठय़ातच लहान मुलांच्या अंगावरून तांदूळ काढून त्याचे स्वागत होत असे. मात्र सध्या लॉकडाऊनमध्ये गावी आलेल्या चाकरमान्यांचा प्रवास नेमका उलटा ठरत आहे. स्थानकावर उतरल्यावर ना कोणते वाहन, ना कोणी स्वागताला. उलट गावात प्रवेश केल्यावर ‘आले हो चाकरमानी…’ अशी कुचेष्टा. मोठा गुन्हा करून गावाला आला आहे अशा संशयी नजरा. त्यातूनच घरी आल्यावर थेट गुराच्या गोठय़ात रवानगी. कोरोनाच्या महामारीत जरी हा नाईलाज असला तरी ज्या गावात, ज्या घरात अखेरचा शब्द वागवत वावरलो तेथे झालेली अवस्था त्याच्यासाठी खिन्न करणारी आहे.
मुक्त जिल्हा कोरोनायुक्त !
मुंबई, पुणेसह राज्यातील मोठमोठय़ा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. त्याचवेळी जिल्हय़ात गुहागर तालुक्यातील शृंगारतळीतळीतून पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर खेड, रत्नागिरी या तीनच तालुक्यात रुग्ण आढळले. ते सर्वच्या सर्व पुढे उपचारानंतर बरे होऊन जिल्हा कोरोनामुक्त झाला. मात्र मुंबईतून चाकरमान्यांची आवक जसजशी सुरू झाली तसतसे एक एक रुग्ण वाढत गेले आणि शून्य रुग्णसंख्या असलेला जिल्हा पाहता पाहता दीड शतक ओलांडून पुढे कधी गेला हे कुणालाच कळले नाही. सिंधुदुर्ग जिह्यातही चाकरमान्यांमुळे आतापर्यंत 17 जण बाधित झाले आहेत. गुहागरला चाकरमान्यांमुळे दोघा स्थानिक ग्रामस्थांना बाधा झाल्याचा मुद्दा पुढे येत आहे. लॉकडाऊन आणि मुंबईतील परिस्थिती यावर गावाकडे परतलेल्या चाकरमान्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी मांडलेली व्यथा अस्वस्थ करणारी आहे. ते म्हणतात की, मराठवाडा, विदर्भासह इतर भागातील दुष्काळाला कंटाळून हजारो कुटुंबे आपले पोट भरण्यासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरात स्थलांतरित होतात तशी चाकरमान्यांची परिस्थिती झालेली आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना लॉकडाऊन वाढत गेले. अशा स्थितीमध्ये कुटुंबाचे पोट आणि घरभाडे कसे भरायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे.
राजेंद्र शिंदे