धामापूरमधील देवस्थळी कुटूंबाचा आदर्श, गावकरीही चाकरमान्यांच्या सोयीसाठी सरसावले
मनोहर सप्रे/ देवरुख
कोरोनाच्या महामारीत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली आहे. मात्र गावाकडचे लोकं याला स्विकारण्यास तयार नसल्याचे चित्र उभे केले जात होते. या प्रतिमेला छेद देत संगमेश्वर तालुक्यातील धामापुर तर्फे संगमेश्वर मधील देवस्थळी कुटुंबीयांनी आपल्याच घराशेजारचे रिकामे घर चाकरमान्यांना उपलब्ध करून दिले आहे.
कोरोना लढाईत आत्मनिर्भर बनलेल्या देवस्थळी कुटुंबियांच्या या प्रेरणेने आता गावकरीही पुढे सरसावले असून गावात रिकामी घरे शोधून चाकरमान्यांची व्यवस्था केली जात आहे. जगासह देशात आणि राज्यासह मुंबईत कोरोनाची प्रचंड लाट आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने चाकरमानी हवालदिल झाले होते. अशातच चौथ्या लॉकडाऊनपूर्वी त्यांना गावी येण्याची संधी मिळाली. मिळेल त्या मार्गाने चाकरमानी गावी आले. चाकरमान्यांना गावात घ्यावे की न घ्यावे असा प्रश्न होता. तेवढय़ातच क्वॉरंटाईन सेंटरची क्षमताही संपली. अशातच तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांची संख्याही वाढू लागली. यामुळे एरव्ही चाकरमानी गावात आले की दिवाळी साजरी करणारे गाववाले त्यांच्याकडे ढुंकुनही बघायला तयार नाहीत. उलट चाकरमान्यांना गावी घेऊ नये यावर अनेक ठिकाणी एकमत झाले.
मात्र, आपल्याच गावात येणाऱया चाकरमान्यांचे हाल काय होतील यावर उपाय शोधला तो माखजनजवळच्या धामापुर गावातील देवस्थळी कुटुंबाने गावातील सुवर्णा आणि सुर्यकांत देवस्थळी यांनी आपल्या घराशेजारीच रिकामे असलेले घर चाकरमान्यांना उपलब्ध करून दिले. 16 मे पासून याच घरात 4 चाकरमानी राहत आहेत. आणखी 2-4 जणांची सोय इथे होऊ शकते. देवस्थळींचा मुलगा प्रसाद हा नोकरीनिमित्त मुंबईत आहे. कोरोना नियंत्रणात आल्याशिवाय तो गावी येणार नाहीये. अशा स्थितीत या कुटुंबाने घेतलेल्या या धाडसी निर्णयाला प्रसादनेही पाठींबा दिला. त्यामुळे आता गावकरीही चाकरमान्यांच्या सोयीसाठी पुढे सरसावले आहेत. ग्रामस्थांच्यावतीने संपूर्ण गावातील रिकामी घरे शोधण्याचे काम सुरू आहे. या रिकाम्या घरात त्यांना राहाण्याची सोय करण्यात येणार आहे. आपलाच ग्रामस्थ या संकटामुळे कुठे बाहेर फेकला जाऊ नये यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकारही आत्मनिर्भर भारतासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
ज्या धामापुर गावात देवस्थळी कुटुंबियांनी हे धाडस दाखवले आहे त्याच गावात काल दोन कोरोना पॉझीटिव्ही रूग्ण सापडले आहेत. अशा स्थितीत या कुटुंबाने आणि गावाने दाखवलेले हे धाडस कौतुकाचा विषय ठरले आहे. या सर्वांचा आदर्श केवळ तालुक्यानेच नव्हे तर जिह्याने घेतल्यास यापुढेही येणाऱया चाकरमान्यांच्या सोयीचा प्रश्न आपोआप निकाली निघणार आहे.
त्यांचही गावाशी नातं…
आमचं चाकरमान्यांशी रक्ताचं नातं नसल तरी गावाच त्यांच्याशी आणि त्यांच गावाशी नक्कीच नातं आहे. यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. कोरोना लढाईत प्रत्येकाने असा सकारात्मक विचार केल्यास अडचणींवर मात करता येईल.
सुर्यकांत देवस्थळी, धामापूर.