वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नव्या दिशानिर्देशांनुसार आता कोरोना संशयिताचा मृतदेह शवागारात पाठविण्यापूर्वी चाचणी केली जाणार आहे. नाकातून द्राव प्राप्त केला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यावरच मृतदेह जिल्हा प्रशासनाला सोपविण्यात येणार आहे. आयसीएमआरने स्वतःच्या ‘स्टँडर्ड गाइडलाइन फॉर मेडिको लीगल अटॉप्सी इन कोविड-19 डेथ इन इंडिया’मध्ये प्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंत तसेच अहवाल प्राप्त होईपर्यंत शवागारातून मृतदेह बाहेर काढला जाणार नसल्याचे म्हटले गेले आहे.
सर्व कोरोना संशयितांच्या मृत्यूनंतर इमर्जन्सी वॉर्डमध्येच नाकातून द्रावाचा नमुना घेत तो पीसीआर चाचणीसाठी पाठविला जाणार आहे. अन्य सामान्य रुग्णांच्या मृत्यूनंतर अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यावर पुढील प्रक्रिया करता येणार आहे. संबंधित रुग्णाचा इतिहास महामारीशी जोडला गेलेला नसला तरीही मृतदेह एका निर्धारित प्रक्रियेनंतरच जबाबदार व्यक्तीकडे सोपविण्यात येणार आहे.
मृतदेहानजीक दोनपेक्षा अधिक कुटुंबीयांना थांबता येणार नाही. तसेच या दोन्ही जणांना मृतदेहापासून 1 मीटरचे अंतर राखावे लागणर आहे. प्लास्टिक बॅग न उघडताच दूरवरून मृतदेह ओळखावा लागणार आहे. दिशानिर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी देखरेख यंत्रणेचे सदस्य हजर राहणार आहेत. मृताच्या 5 पेक्षा अधिक नातलगांना उपस्थित राहता येणार नाही.
दफन केल्यास…
मृतदेह दफन केला जात असल्यास प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वरील भागाला सिमेंटने आच्छादिले जाणार आहे. शक्य असल्यास अंत्यसंस्कार इलेक्ट्रिक शवदाहिनीत पूर्ण केले जातील. या प्रक्रियेत मृतदेहाची देखभाल कमी प्रमाणात करावी लागणार आहे.