केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी 13 राज्यांना पत्र लिहून कोरोना चाचण्यांच्या घटत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. कोरोनाविषयक अधिकाधिक चाचण्या करून संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आले. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गोवा, जम्मू-काश्मीर, केरळ, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान आणि सिक्कीम या राज्यांना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत.
सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी नवे रुग्ण शोधून संसर्ग आटोक्यात ठेवण्याची गरज आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यास नव्या बाधितांमध्ये आपोआपच घट होऊन संसर्गही नियंत्रणात येईल, असा दावा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक कमी चाचण्या करणाऱया राज्यांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच लसीकरण वाढविण्याची सूचनाही करण्यात आली आहे. केरळ सरकारला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट आकडेवारी मांडण्यात आली असून ऑगस्ट महिन्यात 2.96 लाख होणाऱया चाचण्या आता नोव्हेंबर महिन्यात 64 हजारांवर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पश्चिम बंगाललाही अधिक सतर्क करण्यात आले आहे. चाचण्यांमध्ये घट झाल्यास संसर्गाचे योग्य मूल्यांकन होणार नाही. गेल्या काही दिवसांत बंगालसह अनेक राज्यांमध्ये सकारात्मकतेचे प्रमाणही वाढत असल्याचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे.