ऑनलाईन टीम / पुणे :
कार्यकर्ता अधिकारी असणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांनी चाणक्य मंडळाच्या माध्यमातून ‘माणूस’ घडविण्यासह राष्ट्रहित जपणारा युवक घडवला आहे. आज चाणक्य मंडळाचा विस्तार मोठा असून, त्यातील अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून देशसेवा करत आहेत. बाजारात रेडिमेड वस्तू सर्वत्र मिळतात; मात्र रेडिमेड माणसे मिळत नाहीत. ती घडवावीच लागतात. पगारवाढ, मोर्चे, आंदोलन न करता राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने चाणक्य मंडळ पावले टाकत आहे. राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल त्यासाठी आवड असावी लागते. धर्माधिकारी यांच्यात ती आवड असल्याने ते गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी घडवत आहेत, असे गौरवोद्गावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.
विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित ‘आत्म्याचे नाव अविनाश’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, डॉ. अनिल गांधी, वर्षा गांधी, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनीआदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, प्रशासनाला लागलेली भष्ट्राचाराची कीड दूर करण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. प्रशासनात काम करणाऱ्यांनी कार्यक्षम, संवेदनशील, प्रामाणिक पद्धतीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रातील युवक मोठ्या संख्येने प्रशासकीय सेवेत व संरक्षण दलात प्रवेश करत आहेत. या अधिकाऱ्यांना कार्यक्षम घडविण्याचे काम अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडळच्या माध्यमातून करत आहेत. पुण्याने देशाला प्रचंड क्षमतेची माणसे देशाला दिली. आताचे लष्करप्रमुख हेदेखील इथलेच आणि प्रशासकीय अधिकारी तयार करणारे धर्माधिकारीही पुण्याचेच आहेत, हा योगायोग आहे.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “चरित्र लिहिण्यासारखे माझ्या हातून कोणतेही मोठे कार्य घडले, असे वाटत नाही. अजून खूप कार्य करणे बाकी आहे, कुटुंबाच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या साथीमुळे गेल्या पंचवीस वर्षापासून प्रशासकीय अधिकारी घडवण्याचे काम होत आहे. सर्वांच्या प्रेमापोटी हे चरित्रग्रंथ निर्माण झाले असून, ते सर्वाना अर्पण करतो. शिवाजी महाराज नेहमी प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा देतात. जीवनात अनेक माणसे भेटत गेल्यामुळे जीवन समृद्ध झाले. प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. कारण प्रशासकीय काम हे देशसेवा करण्यासाठी आहे. अधिकाऱ्यांनी स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करावा. आताच्या पिढीने कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, हे ठरवणे गरजेचे आहे. स्वतःची क्षमता ओळखून त्या क्षेत्रात जाणे गरजेचे आहे.” यावेळी कसबा पेठेतील लहानपणीच्या आठवणींना धर्माधिकारी यांनी उजाळा दिला.