डांबरीकरणामुळे जळगा-चापगाव भागातील प्रवाशांतून समाधान : रस्त्याच्या दुतर्फा मुरूम टाकण्याचे काम शिल्लक
वार्ताहर /खानापूर
खानापूर ते चापगावला जोडणाऱया करंबळ-जळगा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले होते. पण गेल्या आठवडाभरापासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम संबंधित विभागाने हाती घेतल्यामुळे प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळय़ापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होणार होते, परंतु पावसाळा संपून उन्हाळय़ाला सुरुवात झाली तरी रस्ता कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर प्रवासीवर्गाच्या मागणीची दखल घेऊन प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत संबंधित विभागाने या रस्त्याचे काम पूर्णत्वाला आणले आहे. त्यामुळे हा रस्ता सुव्यवस्थित व सुसाट झाला आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून रस्त्याच्या दुतर्फा मुरूम टाकण्याचे काम शिल्लक आहे. रस्ता भक्कम झाला पाहिजे यासाठी स्थानिक नागरिकांनीही यासाठी संबंधित कंत्राटदार व प्रशासकीय यंत्रणेला दम देऊन काम करून घेतले आहे. हे काम हाताळण्याची जबाबदारी आगामी पाच वर्षे संबंधित कंत्राटदाराची राहणार असून रस्त्याची दुरुस्ती अथवा डांबरीकरण योग्य झाले नसल्यास दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. त्यामुळे संबंधित प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या अभियंते व वरि÷ अधिकाऱयांची याकडे कटाक्षाने नजर राहणार आहे.
वर्षभरापासून या रस्त्याचे काम रखडले होते. पावसाळय़ापूर्वी टाकण्यात आलेली खडी उखडून अपघाताला निमंत्रण मिळत होते. चापगावमार्गे या भागातील लोकांना खानापूरला केवळ 9 कि.मी. लांबीचा हा रस्ता आहे. शिवाय या भागात येणाऱया कारलगाहट्टी, जळगा, करंबळ गावच्या नागरिकांना हा रस्ता सोयीचा असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. खानापूरपासून चापगावला जोडणारे अनेक रस्ते आहेत. लालवाडीमार्गे जाणारा रस्ता खानापूर ते चापगाव जवळपास चौदा कि.मी. अंतराचा आहे. दुसरा रस्ता पारिश्वाड रस्त्यावरून यडोगामार्गे खानापूरला जोडणारा रस्ता 11 कि.मी. लांबीचा आहे. या दोन रस्त्यांपैकी जवळचा करंबळ ते चापगाव रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याची नागरिकांना नितांत गरज होती. या रस्त्याची कायमची समस्या दूर करण्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून अनेक वेळा प्रयत्न झाले.
तत्कालीन आमदार कै. अशोक पाटील यांच्या काळामध्ये या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. या रस्त्यावर येणाऱया दोन पुलांसाठी पूरक निधी नसल्याने रस्त्याचे काम रखडले. त्यानंतर माजी आमदार प्रल्हाद रेमाणी, माजी आमदार अरविंद पाटील यांनी यासाठी कोटीचा निधी मंजूर केला होता. पण त्यावेळीही रस्त्यावरील नाल्यावरील पूल निर्मितीचा प्रश्न निर्माण झाल्याने निधी वापस गेला. त्यानंतर मागील कार्यकाळात या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेतून पूर्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार अनंतकुमार हेगडे आणि आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी निधीसाठी पाठपुरावा केला. या रस्त्यासाठी तब्बल 6 कोटींचा निधी मंजूर झाला. यामधून करंबळ ते चापगावपर्यंतच्या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण त्याचप्रमाणे या रस्त्यावर येणाऱया दोन नाल्यांवर भक्कम पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा रस्ता बारमाही प्रवासासाठी सुलभ व लाभदायक ठरणार आहे.
नागरिकांतून समाधान
शिवाय जळगा तसेच कारलगाहट्टीr या गावांना हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरला असून जळगा तसेच खानापूरशी संपर्क ठेवण्यासाठी सोयीचा झाला आहे. शेतकरीवर्गाला पिके घेण्यासाठी सुलभ असा रस्ता झाल्याने या रस्त्याच्या उभारणीसाठी आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय यंत्रणेने निधीची तरतूद केल्यामुळे प्रवासी वर्गातून व या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.