गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य : हेस्कॉमचा नाकर्तेपणा : खंडित वीजपुरवठय़ाने गावागावात भीषण पाणीटंचाई : विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम
वार्ताहर /चापगाव
गेल्या दोन-चार दिवसांत नंदगड-चापगाव भागात वारंवार होणाऱया खंडित वीजपुरवठय़ामुळे या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. सलग गेले दोन-तीन दिवस या भागात वीजपुरवठा नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई तसेच विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने सर्व भाग नॉटरिचेबल झाला आहे. यामुळे हेस्कॉम खात्याच्या या नाकर्तेपणाबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस होत असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. पण हेस्कॉमकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मात्र आवश्यक मनुष्यबळ राबवले जात नसल्याने या भागातील अनेक गावे अंधारमय झाली आहेत. वास्तविक, नंदगड, हेब्बाळ, चापगावसह जवळपास 15 हून अधिक खेडय़ांना हेब्बाळ फिडरमधून वीजपुरवठा केला जातो. यापूर्वी डुक्करवाडी पॉवर स्टेशनमधून वीजपुरवठा केला जात होता. पण सध्या या विभागातून हा पुरवठा बंद करून बिडी सब सेंटरमधून केला जात असल्याचे कळते. वास्तविक या भागातील गावात झाडी अथवा जंगल नाही. असे असताना वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची कारणे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
नंदगड हे प्रामुख्याने खानापूरनंतरचे मोठे गाव. या ठिकाणी अनेक दळणवळण व्यवसायाबरोबर गिरणी व्यवसाय तसेच बाजारपेठही आहे, पण या भागातही गेल्या दोन दिवसात सुरळीत वीजपुरवठा नाही. त्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे. मंगळवार तसेच बुधवार दोन्ही दिवस वीजपुरवठा नसल्याने संपूर्ण भाग अंधारमय झाला आहे. या भागातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने बोअरवेल चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मंगळवारी दिवस व रात्री खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी सकाळपासून सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु बुधवारी रात्रीही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे गेले दोन दिवस अंधाराचा सामना करण्याची वेळ या भागातील नागरिकांवर आली आहे. वीजपुरवठा नसल्याने मोबाईलधारकांचीही मोठी गोची झाली आहे. शिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरही याचा परिणाम झाला आहे.
सुरळीत पुरवठा न केल्यास हेस्कॉमवर मोर्चा
खानापूर भागात सुरळीत पुरवठा आहे, पण नंदगडसह खेडय़ापाडय़ातील भागांमध्ये हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉम खाते का दखल घेत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक, या भागात असलेले विभागीय अधिकारी कुचकामी ठरले आहेत. या अधिकाऱयांच्या विरोधात या भागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. परंतु याबाबत हेस्कॉम वरि÷ अधिकारी त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे हेस्कॉमच्या नाकर्तेपणाबद्दल या भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी सुरळीत पुरवठा करण्यात आला नाही तर हेस्कॉमवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नंदगड, चापगाव, हेब्बाळसह या भागातील नागरिकांनी दिला आहे.