ऑनलाईन टीम / पुणे :
सियाचीन हा अतिशय दुर्गम आणि कठीण भाग असला तरी तो भारताला आवश्यक भाग आहे. सियाचीन वर शासनातर्फे दररोज 5 करोड रुपये खर्च केले जातात. 500 सैनिकांवर एवढा खर्च का करायचा असे बरेच जण म्हणतात. परंतु 5 मोठ्या देशाच्या सीमा या ठिकाणी मिळतात. चायना, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे असेल तर, सियाचीन भारताच्या हातात असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडीयर प्रसाद जोशी यांनी केले.
सियाचीन भागात पराक्रम गाजविताना जायबंदी झालेले मराठा लाईफ इन्फट्रीचे हवालदार प्रशांत मुळे यांचा सन्मान अखिल मंडई मंडळाच्या वतीने करण्यात आला. निवृत्त हवालदार मेजर बजरंग निंबाळकर आणि हवालदार संदीप मोरे यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, विश्वास भोर, देविदास बहिरट, राजेश कारळे, आनंद सराफ, सुरज थोरात, अनिकेत तापकीर, अजय झवेरी, आनंद इनामदार, हरिष मोरे, अमोल पडळकर, ओमकार थोरात, आशिष थोरात यावेळी उपस्थित होते.
प्रसाद जोशी म्हणाले, सियाचीन हा भारताचा अतिशय मौल्यवान आणि महत्त्वाचा भाग आहे. आज अनेकांना सियाचीन हा देशाच्या नकाशावर नेमका कुठे आहे, हे माहित नाही. सियाचीनमध्ये केवळ बर्फ असतो. 1 किलोमीटर अंतर चालायला 5 तास लागता. एकटा माणूस कुठेही जाऊ शकत नाही. अतिशय कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपले जवान तिथे राहत असतात. यावरुन सियाचीनचे महत्त्व आपल्या लक्षात येते. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.