सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. भारतात मिळणारे चायनीज डिश चिनी पद्धतीनेच तयार केला जातो पण फरक एवढाच आहे की तो भारतीयांच्या चवीला ओळखून त्यात बदल केले गेलेले आहेत.
भारतीयांना तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खूप आवडतात आणि भारतात मिळणारे चायनीज त्याप्रमाणेच बनवले जाते. पण चीनमध्ये मिळणारे चायनीज तेलकट आणि मसालेदार नसतात आणि त्यात मांस जास्त वापरले जाते.
आपल्याला चायनिज गोष्टींचे आकर्षण पहिल्यापासूनच आहे. अगदी चिनी बनावटीच्या वस्तूंपासून चायनिज पदार्थापर्यंत. चायनिज पदार्थाची तर सध्या सर्वानाच चटक लागली आहे. चीनमध्ये मिळणारे चायनिज पदार्थ व भारतात मिळणारे चायनिज पदार्थ यात फरक आहे. भारतीयांच्या जिभेला पूरक ठरतील, अशा चवीचे हे पदार्थ तयार केले जातात. रस्त्याशेजारी फुटपाथवर गल्लोगल्ली मिळणारे चायनिज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात द्यायचे, तर त्यांचे ‘कुक’ अनेक तडजोडी करतात. त्यात निकृष्ट दर्जाचे तेल आणि भाज्या वापरल्या जातात. त्याहीपेक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
चायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. भात, बांबूचे मूळ, मशरुम्स, नूडल्स हे चिनी लोकांचे ‘स्टेपल फूड’ आहे, तसे ते आपले नाही. नूडल्स, चिकन किंवा मांस अर्धकच्चे शिजवले गेले तर पचायला हानीकारक आहेत. शिवाय मैदा आतडय़ात जाऊन चिकटत असल्यामुळे त्याचा अतिरेकी वापर घातक आहे. ‘रोडसाइड चायनिज फूड’मध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश्ड किंवा रिफाइंड असल्याने पचनसंस्थेसाठी हितकर नसतो.
फक्त भाज्या अर्धकच्च्या शिजवल्या तरी त्यांचा काही त्रास होण्यासारखा नाही. एखाद्यावेळी चायनिज पदार्थ खाण्याने काही बिघडत नाही; परंतु आठवडय़ातून तीन-चार वेळा तरी चायनिज पदार्थ हाणण्याची सवय हानीकारक ठरू शकते. या पदार्थामध्ये होणारा स्वस्त कच्च्या मालाचा व कृत्रिम रंगांचा वापर, सॉसेसचा व ‘प्रिझर्व्हेटिव्हज्’चा सढळ वापर, भरपूर तेल वापरले जात असल्यामुळे जास्त प्रमाणात मिळणाऱया कॅलरीज हे सर्व शरीरासाठी घातक आहे.
भारतीय पदार्थांची खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यांना अधिक चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. अजिनोमोटो म्हणजेच Monosodium glutamate (MSG). याचा वापर करून विशिष्ट पदार्थांचे आकर्षण वाढवले जाते. मोमोज, नुडल्स यासारख्या चायनीज पदार्थांचे हळूहळू लोकांना व्यसनच लागते. त्यामुळे या अजिनोमोटोचा आहारातील समावेश कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला जातो.
अजिनोमोटोचेच केमिकल नाव म्हणजे सोडियम सॉल्ट ऑ़फ ग्लुटॅमिक असिड. आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीवर अजिनोमोटोच्या अतिसेवनाचा परिणाम होतो. शरीरात अतिप्रमाणात अजिनोमोटो हे फूड अडक्टीव्ह गेल्यास पॅनिक अटॅक येणं, गरगरणे अशा समस्या वाढतात. लहान मुलांच्या आहारात अजिनोमोटो अधिक प्रमाणात जाणंदेखील त्रासदायक ठरू शकते. यामुळे लहान मुलांच्या वागाण्यात प्रकर्षाने बदल होतात. तरुणांच्या आहारात दर दिवसाआड 2.5 mg/g अजिनोमोटो गेल्यास ते हायपर अक्टीव्ह होतात. अजिनोमोटोच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये फॅट साचून राहण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे कालांतराने यकृताचे विकार जडण्याचे प्रमाण वाढते. दाह वाढू शकतो.