डेहराडून / वृत्तसंस्था
अनेक दिवसांपासून बंद असलेली चारधाम यात्रा शनिवार, 18 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. न्यायालयाने या यात्रेला हिरवा कंदील दाखविल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी यासंबंधीची घोषणा केली. चारधाम यात्रेला दिलेली स्थगिती उठवतानाच, कोरोनाविषयक नियमांचे कठोर पालन करून ही यात्रा पार पाडावी, असे निर्देश उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने यात्रा सुरू केली आहे. यात्रेकरूंसाठी कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आणि लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान भाविकांना मंदिरांभोवती असलेल्या कुंडांमध्ये स्नान करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
चारधाममधील मंदिरांना भेट देणाऱया भाविकांच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा घालण्यासारख्या निर्बंधांसह ही यात्रा सुरू होईल, असे मुख्य न्यायाधीश आर. एस. चौहान व न्या. आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने यात्रेवरील बंदी उठवताना सांगितलेले होते. तसेच ‘चारधाम’ म्हणून ओळखल्या जाणाऱया हिमालयातील या प्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणाऱया भाविकांच्या दैनंदिन संख्येवर न्यायालयाने मर्यादा घातली. केदारनाथ धाममध्ये दररोज 800, बद्रिनाथ धाममध्ये 1,200, गंगोत्रीत 600, तर यमुनोत्रीत 400 भाविकांना प्रवेश दिला जाईल, असे न्यायालयाने ठरवून दिले.