उच्च न्यायालयाने हटविली बंदी
वृत्तसंस्था/ नैनीताल
उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेतील भाविकांची संख्या वाढविण्यावरून दाखल याचिकेवर मंगळवारी सुनावणी केली आहे. न्यायालयाने चारही धाममधील भाविकांच्या संख्येवरील मर्यादा देखील हटविले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर भाविक आता कुठल्याही बंधनाशिवाय दर्शन घेऊ शकणार आहेत. शासनला कोरोना विषयक दिशानिर्देशांचे पालन सुनिश्छिचत करावे लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्य न्यायाधीश आर.एस. चौहान आणि आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीदरम्यान महाधिवक्ते एस.एन. बाबुलकर यांनी सरकारची बाजू मांडली आहे. चारधाम यात्रा करण्यासाठी कोरोना संकट पाहता न्यायालयाने यापूर्वी भाविकांची संख्या निश्चित केली होती. पण सद्यकाळात राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण फारच कमी सापडत आहेत. याचमुळे चारधाम यात्रा करण्यासाठी भाविकांच्या निश्चित संख्येविषयीच्या आदेशात दुरुस्ती करण्यात यावी असे सरकारकडून म्हटले गेले.
चारधाम यात्रा समाप्त होण्यास आता 40 दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. याचमुळे येणाऱया सर्व भाविकांना दर्शनाची अनुमती देण्यात यावी. दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करणारे भाविक प्रत्यक्ष येत नसल्याने स्थानिक लोकांच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला असल्याचा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला.
यापूर्वी चारधाम यात्रा करण्यासाठी प्रतिदिन केदारनाथ धाममध्ये 800, बद्रीनाथ धाममध्ये एक हजार, गंगोत्रीमध्ये 600 तर यमुनोत्री धाममध्ये 400 भाविकांना जाण्याची अनुमती न्यायालयाने दिली होती.