ऑनलाईन टीम / रांची :
चारा घोटाळा प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात काढलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे आता लालू यादव यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुमका कोषागारमधून अवैधरित्या 3.13 कोटी काढल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. या घोटाळ्यातल्या 4 प्रकरणांसंदर्भात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील 3 प्रकरणांमध्ये त्यांना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.
लालू यांचे वकील देवर्षि मंडल यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची स्थिती लक्षात घेता याप्रकरणी ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश सिंह यांच्या खंडपीठाने दुमका कोषागार प्रकरणी सुनावणीनंतर आरजेडी नेते लालू प्रसाद यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे. दुमका कोषागारमधून अवैधरित्या रक्कम काढल्याप्रकरणी याआधी देखील अनेकदा सुनावणी झाली होती. मात्र, लालू यादव यांनी दिलासा मिळाला नव्हता.
दरम्यान, आपण अर्धी शिक्षा भोगली आहे, असे लालूप्रसाद यादव यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते. याचिकेत त्यांनी असेही म्हटले होते, की आपले वय खूप आहे. त्याचबरोबर विविध गंभीर आजाराने आपण ग्रस्त आहोत, त्यामुळे जामीन दिला जावा. दरम्यान, दुमका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आता लालू प्रसाद यादव तुरुंगातून बाहेर आले आहेत.
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केलेला असून न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. ते सध्या एम्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सद्य स्थितीत त्यांच्या किडण्यांना संसर्ग झालेला असून त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होत आहे, असे,अशी माहिती त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी दिली आहे.