ऑनलाईन टीम / रांची :
आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळय़ात रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणात यादव यांना 21 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
झारखंडच्या दोरांडा कोषागारातून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून 24 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 1996 साली झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी 26 वर्षांनंतर न्यायालयानं निकाल दिला आहे. लालूप्रसाद यादव यांना 21 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
1990 ते 95 या काळात लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री असताना बिहारच्या सरकारी तिजोरीतून पशुखाद्याच्या नावावर 950 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले होते. पुढे लालू यात अडकत गेले. लालूप्रसाद यांना झारखंडमधील चारा घोटाळ्याच्या पाच प्रकरणांमध्ये आरोपी बनवण्यात आले होते. यातील चार प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून 27 वर्षांची शिक्षा सुनावली. चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या आणि पाचव्या खटल्याचा आज निकाल लागला. हे प्रकरण रांचीमधील दोरांडा कोषागारातून 139 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याशी संबंधित होते.