चापगाव / वार्ताहर
सध्या देशात लॉकडाऊन असल्याने उद्योगांसह शेती व्यवसायही पूर्णतः लॉकडाऊन झाला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे बहुतांश शेतकऱयांनी शेताकडे जाणेही टाळले आहे. यामुळे शेतकऱयांना नुकसानदायक ठरत आहे. बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान चापगावजवळील शिवोली गावाजवळ अज्ञाताने आग टाकल्याने बलोगा येथील तालुका पंचायत सदस्य वासुदेव नांदुरकर यांचा जवळपास चार एकरातील ऊस जळून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
वासुदेव नांदुरकर यांचे शिवोलीजवळ शेत आहे. त्यांनी गेल्या जानेवारीत ऊस तोडणी केल्यानंतर उत्तम रित्या उसाचे खोड वाढविले आहेत. परंतु गेल्या आठ दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने ते चार दिवस शेताकडे फिरकले नाहीत. बुधवारी दुपारी अज्ञाताने सदर पिकात आग टाकल्याने ऊस व ठिंबक सिंचनचे सर्व साहित्य जळून लाखोचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन त्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.